महाविकास आघाडीचेच सरकार येणार ; देशाचा मुळ मालक आदिवासीच – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले : वाडीवऱ्हे येथे निर्धार मेळाव्यात सरकारवर घणाघात

इगतपुरीनामा न्यूज – देशाचा मूळ मालक आदिवासीच आहे. यावेळी महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार येणार असून ही काळ्या दगडावरची रेष आहे. गोरगरीबांचा पैसे लुटण्याचा कार्यक्रम या सरकारने केला आहे. त्यामुळे या काळ्या भ्रष्ट सत्तेला वेळीच आवर घालण्याची वेळ आली आहे. लाडकी बहीण योजनेचे गाजर दाखवून डाळी, तेल, गॅस, वीज बिल यांचे भाव वाढवले आहेत. हे भाऊ नसुन बैमान आहे. मोदी सरकार आल्यापासून जातीय जनगणना बंद झाल्या आहेत. आदिवासींचे आरक्षण संपवण्याचे काम भाजप करीत आहे. देश वाचविण्यासाठी मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी महाविकास आघाडीचे काम केले पाहिजे. वनजमिनींचा उतारा प्रत्येक आदिवासी बांधवाला मिळवून देणार आहे. आता खावटी बंद करायचे काम सरकारने केल्याचा आरोप इंदिरा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. केंद्र व राज्य शासनाकडून शेतकरी व आदिवासी, कष्टकरी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात वाडीवऱ्हे येथे निर्धार मेळाव्यात नाना पटोले बोलत होते.

कार्यक्रमाचे उदघाटक अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथल्ला म्हणाले की, आदिवासी लोकांना जल जंगल जमिन देण्याच काम काँग्रेसने केले आहे. भाजप जातीय राजकारण करून दंगली घडविण्याचे काम करत आहे. आदिवासींच्या हितासाठी काँग्रेस सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. निर्धार मेळाव्याचे आयोजन इगतपुरीचे माजी सभापती गोपाळ लहांगे, आदिवासी प्रदेश उपाध्यक्ष रमेश कहांडोळे, आदिवासी प्रदेशाध्यक्ष बळवंत गावित यांनी केले होते. मेळाव्याला आलेल्या मान्यवरांचे स्वागत गोपाळ लहांगे यांनी केले. याप्रसंगी आदिवासी काँग्रेसचे शिवाजीराव मोघे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र प्रभारी निजामुद्दीन सैय्यद, जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल, राजाराम पानगव्हाणे, राहुल दिवे, आकाश छाजेड, जिल्हा चिटणीस वैभव ठाकुर, आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव, प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ, इगतपुरी तालुकाध्यक्ष रामदास धांडे, डॉ. शरद तळपाडे उपस्थित होते. आभार प्रदर्शन गोपाळ लहांगे यांनी केले. मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव हजर होते.

Similar Posts

error: Content is protected !!