
इगतपुरीनामा न्यूज – भारतीय हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, कळवण, बागलाण, नांदगाव आणि मालेगाव या ८ तालुक्यांतील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, अंगणवाड्या, आश्रमशाळा तसेच सर्व महाविद्यालयांना उद्या शनिवारी १ ऑगस्ट २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अतिवृष्टी, पूरस्थिती, भूस्खलन आणि ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार आवश्यकतेनुसार उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले असून नदी, नाले, धबधबे, घाट परिसर, पूरप्रवण आणि भूस्खलनाच्या धोक्याच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे सांगितले आहे. तसेच सर्व धबधबे, ट्रेकिंग पॉइंट्स, पर्यटनस्थळे आणि पूरप्रवण धार्मिक स्थळांवर पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. आठवडी बाजार, जत्रा आणि मोठे सार्वजनिक कार्यक्रमही १ ऑगस्ट रोजी स्थगित करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.