इगतपुरीनामा न्यूज, दि. १६
सगळीकडे सध्या अतिवृष्टी सुरु आहे. त्यामुळे पर्यटन स्थळी जास्त प्रमाणात लोकांची गर्दी होत असल्याने अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नाशिक पश्चिम विभागाच्या अधिनस्त त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने, दुगारवाडी, हरीहर, भास्करगड, अंजनेरी, वाघेरा, इगतपुरी तालुक्यातील भावली, त्रिंगलवाडी, कुरुंगवाडी आदी सर्व गडांवर आणि सर्व पर्यटन स्थळी आजपासून पुढील आदेश होईपावेतो प्रवेश निषिध्द करण्यात आले आहेत. ह्या गडांवर किंवा पर्यटन स्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न नागरीकांनी करु नये, अन्यथा संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशारा नाशिक पश्चिम भाग उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. याबाबत नागरीकांनी नोंद घ्यावी. आणि आदेशाचे काटेकोरपणे पालन करुन नागरीकांनी वन विभागास सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत तंतोतंत पालन करण्यात येणार आहे. नाशिक शहर व सभोवतालच्या परिसरात काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून, नागरीकांना व पर्यटन प्रेमी यांना पर्यटन क्षेत्रास भेट देण्याचा मोह अनावर होणे साहजिकच आहे. परंतु नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रतिबंध करण्यात आलेला आहे.