
इगतपुरीनामा न्यूज, दि. ६
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त इगतपुरी शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, इगतपुरी वन विभाग, सामाजिक वनीकरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले. ऑक्सिजन थीमपार्कच्या बेसवर इगतपुरी येथील तालुका क्रीडा संकुल, ग्रामीण रुग्णालय, स्मशान भूमी, कब्रस्थान व परिसरातील घरांच्या बाजूला आयुर्वेदिक व ऑक्सिजन देणाऱ्या वड, पिंपळ, अशोका, कडुलिंब, बेहडा, त्रिफळा, बेल, तुळस इत्यादी 100 झाडांचे वृक्षारोपण झाले. या उपक्रमात तरुणांनी सहभाग घेऊन वृक्षांचे संगोपन करण्याचा निर्धार तरुणांनी केला.
इगतपुरीतील सिमेंटचे वाढते जंगल आणि निसर्गाची झपाट्याने होत असलेली हानी यामुळे तापमानात वाढ झालेली आहे. औद्योगिकीकरणामुळे रस्त्यांचे जाळे पसरलेले असले तरी रस्त्यालगत वृक्षांचा वाणवा आहे. तर दुसरीकडे इगतपुरी परिसरात दररोज येणाऱ्या हजारो वाहनांमधून सोडण्यात येणारा कार्बन वायूचाही परिणाम होत आहे. तापमान रोखण्यासाठी वृक्ष लावून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे. त्यासाठी अनेक उपक्रम शासकीय पातळीवर राबविण्यात आले. मात्र त्याचा परिणाम झाला नाही. अनेकदा वृक्षारोपण केल्यानंतर काही दिवसांतच ही वृक्ष नष्ट होत होती. त्यांची वाढ न झाल्याने वृक्ष लागवड करूनही फायदा होत नव्हता. यात मनसेने आता वृक्ष लागवड करून त्याची निगा राखण्याची जबाबदारीही निश्चित केली आहे. त्यामुळे वृक्षांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे आहिरे, वनविभागाचे गौरव गांगुर्डे, मनसे शहराध्यक्ष सुमित बोधक, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. स्वरूपा देवरे, आयुषच्या डॉ. पूनम पाटील, डॉ. हिरकणी मोरे, म. गांधी हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल पवार, शिक्षक राहुल पंडित, मनसेचे शत्रुघ्न भागडे, राज जावरे, वाजीद शेख, अरबाज सय्यद, मकसूद खलिफा, सचिन बागुल, आकाश शेलार, धुळीचंद कुमावत आदी उपस्थित होते.
