इगतपुरीनामा न्यूज दि. १८ : पर्यटनासाठी अनुकूल म्हणून इगतपुरी तालुक्याचे नाव परिचित आहे. मुंबई, ठाणे, नाशिक यांसह विविध राज्यांतून इगतपुरी शहरात पर्यटक येत असतात. मात्र, इगतपुरी शहरातील मुख्य रस्त्याची दुरवस्था पाहून नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे.
इगतपुरी शहरातील जुना मुंबई आग्रा मार्ग २०१४ मध्ये समिर भुजबळ यांच्या खासदार निधीतून १४ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला. महिंद्रा कंपनी ते गिरनारे पर्यंत बांधण्यात आलेल्या या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. छगन भुजबळ हे नाशिकचे पालक मंत्री आहेत. पर्यटन क्षेत्रात नाशिकची प्रगती व्हावी ही बाजू नेहमीच त्यांनी मांडली. इगतपुरीचे हिल स्टेशन व्हावे हा त्याचाच एक भाग मात्र, रस्त्याची अशी बिकट अवस्था पाहता पर्यटकांची निराशा होत आहे.
नुकतेच या रस्त्याचे ब्लॉक टेस्टिंग करण्यात आले. यात सर्व नमुने निकृष्ठ दर्जाचे आढळून आले. तालुक्याचे आमदार हिरामण खोसकर यानी नुकतेच रस्ता दुरूस्तीसाठी एक कोटी देण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी संजयकुमार कोकणे यांनी दिली. रस्त्या संदर्भातील बैठकीत अधिकारी कोकणे यानी माहिती दिली होती की कॉंक्रीट रस्त्याची दुरुस्ती ही करता येत नाही व हा रस्ता नव्याने बांधावा लागेल. त्यामुळे नागरिक रस्त्या प्रश्नावर संभ्रमावस्थेत आहेत. त्यातच रस्त्याच्या अतिक्रमणाचा प्रश्न काही वेगळा नाही.
■ शहरातील मुख्य रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असताना त्याचे कॉंक्रीटिकरण झाले. मुळता सार्वजनिक बांधकाम विभाग काम करत असताना पथकिनार नियम लावणे गरजेचे होते. यात १५ बाय १५ मीटर रस्ता अपेक्षित होता ज्यात दोन्ही बाजूला गटार आणि फुटपाथ अनिवार्य होता. इगतपुरीत मात्र हे सगळे नियम धाब्यावर बसविण्यात आले.
■ रस्त्याची अवस्था, मोडीत काढलेले नियम, निकृष्ट दर्जाचे बांधकाम हे सगळे पाहता, जबाबदार व्यक्तीवर कारवाई होणार का? रस्ताचे नव्याने बांधकाम होणार का? इगतपुरी खरचं हिल स्टेशन होणार का? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत आहेत.
![](https://igatpurinama.in/wp-content/uploads/2021/03/IMG_20210318_094904.jpg)
![](https://igatpurinama.in/wp-content/uploads/2021/03/IMG_20210318_094904.jpg)
![](https://igatpurinama.in/wp-content/uploads/2021/03/IMG_20210318_094921.jpg)
![](https://igatpurinama.in/wp-content/uploads/2021/03/IMG_20210318_094921.jpg)