
इगतपुरीनामा न्यूज, दि. ६
शिक्षकांची नोकरी मिळवण्यासाठी बंधनकारक असलेली शिक्षक पात्रता परीक्षा ( टीईटी ) ची वैधता सात वर्षे घटून ती आजीवन मानली जाणार आहे. त्यामुळे देश भरातील लाखो शिक्षकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. केंद्र शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा महाराष्ट्रातील 40 हजार उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शिक्षक पदासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. त्यानुसार गुरुवारी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी टीईटीची वैधता आजीवन केली. एकदा परीक्षा उत्तीर्ण झालेला उमेदवार शिक्षक पदाच्या भरतीत सहभागी होऊ शकणार आहे. 2012 पासून राज्यात शिक्षक भरती होऊ शकली नाही. 2018 मध्ये घोषणा केलेल्या एकूण 12 हजार पदांपैकी 2019-20 मध्ये साडेपाच हजार पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित भरती पूर्ण करून टीईटी आणि टेट परीक्षा उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना न्याय द्यावा अशी मागणी डी. टी. एड, बी. एड स्टुडन्ट असोसिएशनचे राज्य सरचिटणीस प्रा.राम जाधव यांनी केली आहे.