
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब येथे दारूच्या नशेत येऊन जेवणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने महिलेवर कोयता व लाकडी धपलीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना २६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घरी घडली. फिर्यादी सिता संजय वळवी (वय ३४, रा. माणिकखांब, ता. इगतपुरी) या घरकाम आणि मजुरी करतात. आरोपी मंगेश वसंत बर्वे (वय ४५, मूळ रा. वरवंडी, ता. देवळा, जि. नाशिक, सध्या रा. माणिकखांब) हा दारू पिऊन घरी आला आणि “लवकर जेवण दे” अशी कुरापत काढून फिर्यादीला शिवीगाळ करू लागला. वाद वाढल्यानंतर आरोपीने उस तोडणीचा कोयता हातात घेऊन “तुला ठारच मारतो” असे म्हणून फिर्यादीच्या अंगावर धावून जात डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. मात्र फिर्यादीने प्रसंगावधान राखून आरोपीच्या हातातील कोयता ओढून लांब फेकून दिला. त्यानंतर संतापलेल्या आरोपीने घरातील लाकडी धपली घेऊन फिर्यादीच्या उजव्या डोळ्याजवळ, कानाच्या मागे व तोंडावर मारून गंभीर जखमी केले आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केला. घोटी पोलीस ठाण्यात गु.र.नं. २८७/२०२६ अन्वये BNS १०९(१), ११८(२), ११८(१), ३५२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोटीचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रतीक भिंगारदे, पोलीस हवालदार मारुती बोराडे, परीक्षित इंगळे, गुरुदत्त मोरे, अण्णा गोवर्धने, सुनील पाटील, शिवाजी निसाळ, प्रकाश कासार, योगेश यंदे, सनी भवर, मारुती केंद्रे, प्रभू ठोंबरे यांनी आरोपीला अटक करून कसून तपास सुरु केला आहे.