
इगतपुरीनामा न्यूज – गेल्या चार दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काळुस्ते येथील भामनगर दरेवाडी येथील भाम धरणाच्या माथ्यावर असलेला महत्त्वाचा रस्ता पूर्णपणे खचल्याची मोठी घटना समोर आली आहे. या आपत्तीमुळे दरेवाडी येथील आदिवासी बांधवांचा शहराशी असलेला संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे भाम धरणाच्या माथ्यावरील रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या असून रस्ता दुभंगून खाली कोसळला आहे. रस्त्याखालून जाणारी मोरी (पाण्याचा पाईप/ड्रेनेज) पूर्णपणे धसली असून, बाजूच्या डोंगराची माती आणि दरड रस्त्यावर आली आहे. हा रस्ता पूर्णपणे खचल्यास दरेवाडी येथील ४० आदिवासी कुटुंबांचा शहराशी आणि इतर गावांशी संपर्क पूर्णपणे तुटणार आहे. सध्या या धोकादायक रस्त्यावरूनच येथील नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या घटनेची माहिती मिळताच अखिल आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी शासनाकडे तीव्र शब्दांत मागण्या केल्या आहेत. शासनाने तातडीने या परिसरातील आदिवासी बांधवांना आपत्कालीन मदत पोहोचवावी. नागरिकांचे हाल थांबावेत यासाठी हा रस्ता तातडीने आणि मजबूत स्वरूपात पुन्हा तयार करण्यात यावा. स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने कोणत्याही दुर्घटना घडण्यापूर्वी तातडीने उपाययोजना करावी अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांकडून आणि आदिवासी विकास परिषदेकडून होत आहे. व्हिडीओ बातमी पहा https://youtube.com/shorts/1NJUnwnWmzA?si=GN9fOuF4YWSebHhy