महामार्गावरील १०७ भूमिपुत्रांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावरील विविध विभागांत काम करणाऱ्या १०७ स्थानिक कामगारांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या १६ वर्षांपासून रुग्णवाहिका सेवा, रोड मेंटेनन्स, पेट्रोलिंग, अग्निशमन, हाऊस कीपिंग व क्रेन विभागात कार्यरत असलेल्या या कामगारांना कंपनीकडून ई-मेलद्वारे कामावर येऊ नये असे कळवण्यात आले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. इगतपुरी घाट परिसरातील कोणतीही दुर्घटना घडल्यास सर्वप्रथम मदतीला धावून जाणारे हेच कामगार असून घाटातील प्रत्येक कानाकोपऱ्याची त्यांना सखोल माहिती आहे. वाहतूक जाम झाल्यास पर्यायी मार्ग काढणे, दरीत उतरून मदतकार्य करणे अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ते पार पाडत होते. दरम्यान, आधीच्या कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट संपल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. नवीन कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या कंपनीने आम्हाला कामावर कायम ठेवावे, अशी मागणी कामगारांनी केली आहे. यासाठी जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, कामगार आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. या पार्श्वभूमीवर घोटी टोल नाका येथे कामगारांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. कामावर पुन्हा रुजू करून घेतले नाही तर घोटी टोल नाका येथे कुटुंबासह आमरण उपोषणाला बसण्याचा इशाराही कामगारांनी दिला आहे. व्हिडिओ बातमी पहा https://youtu.be/fTchRz1MYe8?si=507-yvuc6sFRo6kB

error: Content is protected !!