२० अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना ४० लाखांचे अनुदान बँक खात्यावर वर्ग : इगतपुरी तालुक्यातील गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजना ठरतेय फायदेशीर

इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र शासनाची गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजना मोठी हिताची ठरत आहे. योजनेमुळे अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळत आहे. शेती करतांना अथवा नैसर्गिक आपत्तीमुळे घरातील कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाल्यास त्या अपघातग्रस्त कुटुंबियांसाठी योजनेअंतर्गत २ लाखांचे आर्थिक सहाय्य केले जाते. नाशिकचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांच्या मार्गदर्शनाखाली २० अपघातग्रस्त कुटुंबियांच्या वारसांना योजनेच्या माध्यमातून ४० लाखांचा निधी खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. संबंधित वारसांनी शासनाचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली. शेती करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. यामुळे कुटुंबाचे आर्थिक साधन बंद होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह ही महत्वपूर्ण योजना सुरू केली आहे. कृषी विभागाचे अधिकारी योजनेविषयी अधिक मार्गदर्शन करीत असल्याने लाभार्थी वारसांना आर्थिक लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत कुटुंबाला दोन लाखांची आर्थिक मदत केली जाते. अपंगत्व आल्यास एक लाखाची मदत केली जाते. शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्याचा अपघात झाल्यास वारसांनी या योजनेसाठी ३० दिवसांच्या आत प्रकरणे सादर करणे गरजेचे आहे. जेणेकरून लवकर त्यांना लाभ मिळेल असे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी सांगितले.

error: Content is protected !!