
इगतपुरीनामा न्यूज – “आम्ही सर्वजण अशी प्रतिज्ञा करतो की, मुलगी १८ वर्षाच्या आत आणि मुलगा २१ वर्षाच्या आत असेल, तर आम्ही बालविवाह करणार नाही. बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही आणि त्याला मदत करणार नाही” ही बालविवाह मुक्तीची शपथ आदर्श महिला स्नेही व बालिका स्नेही ग्रामपंचायत पिंपळगाव डुकरा येथे घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या नवचेतना अभियानांतर्गत महिला सक्षमीकरण व महिलांच्या सन्मानजनक वातावरण निर्मितीसाठी एकल महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी हळदी कुंकू कार्यक्रमात महिलांना कुंकवाचा करंडा भेट देण्यात आला. उपस्थित महिलांनी बालविवाह मुक्त करणार असल्याचा संकल्प केला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, ॲनिमिया मुक्त गाव अभियान निवड, माझी वसुंधरा अभियान ६.० मध्ये सहभाग असलेली पिंपळगांव डुकरा ही ग्रामपंचायत जिल्हाभरात प्रसिद्ध झाली आहे. सरकारने ‘बाल विवाह मुक्त भारत’ मोहीम सुरू केली आहे, ज्या अंतर्गत बालविवाहाविरुद्ध जनजागृती करण्यासाठी शपथ घेतली जात आहे, ज्यामध्ये नागरिक, विद्यार्थी आणि ग्रामपंचायती सहभागी होत आहेत. या अभियानाचा उद्देश २०२६ पर्यंत बालविवाह १० टक्क्याने कमी करून २०३० पर्यंत भारत बालविवाह मुक्त करणे आहे अशी माहिती ग्रामपंचायत अधिकारी हर्षिता पिळोदेकर यांनी दिली. ह्या उपक्रमासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका आणि बचत गटांच्या महिलांनी परिश्रम घेतले.
