
इगतपुरीनामा न्यूज – आगामी गणेशोत्सव, गौरी गणपती, गोकुळाष्टमी आदी सणांच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी पोलीस ठाण्यांतर्गत विविध नियोजन सुरू आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इगतपुरी शहर, संवेदनशील आणि महत्वाच्या गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी व केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी आज इगतपुरीत सशस्त्र संचलन केले. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरीच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्यासह शेकडो पोलीस रस्त्यावर उतरले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी खालची पेठ, बुद्धविहार, रेल्वेस्थानक, सेंट्रल पॉइंट, पटेल चौक, लोया रोड, नवा बाजार, कोकणी मोहल्ला, राममंदिर, तीन लकडी भागात सशस्त्र संचलन केले. दुपारच्या सुमारास इगतपुरी पोलीस ठाणे, वाडीवऱ्हे पोलीस ठाणे, घोटी पोलीस ठाणे, केंद्रीय राखीव सुरक्षा दल यांनी एकत्रित संचलन केले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सज्ज असल्याचा संदेश या संचलनाद्वारे देण्यात आला. सण आणि उत्सव शांततेच्या वातावरणात व्हावेत यासाठी पोलिसांची भूमिका, बंदोबस्त महत्वाचा आहे. यासाठी इगतपुरीसह जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी व अधिकारी कार्यरत झाले आहेत. पोलीस निरीक्षक सारिका आहीरराव यांनी सांगितले की या उत्सव काळात इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर २४ तास पोलीस पथकाचे सूक्ष्म लक्ष राहणार आहे. या काळामध्ये कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची कुमक तैनात ठेवली जाणार आहे. केंद्रीय राखीव दलाचे ३ अधिकारी, ३० कर्मचारी, ६० होम गार्ड , ३० पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. व्हिडिओ बातमी पहा https://youtu.be/IfrrXkElXBE?si=3-8I8ZpuTM9S4DQk
