
इगतपुरीनामा न्यूज – राज्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग होऊन उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम सन २०२५ पीक स्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन नाशिकचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद, इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके, उप कृषी अधिकारी किशोर भरते यांनी केले आहे. कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२५ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सुर्यफूल या ११ पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पीक स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मूग व उडीद पिकासाठी ३१ जुलै तसेच भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सुर्यफूल या पिकांसाठी ३१ ऑगस्ट आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु. ३०० व आदिवासी गटासाठी रक्कम रु. १५० राहील. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.
पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेकरिता सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकाची भात पिकाच्या बाबतीत किमान २० आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान ४० आर (१ एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पीक स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. सहभागी होण्यासाठी १) विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), २) ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ३) ७/१२, ८-अ चा उतारा, ४) जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), ५) पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, ६) बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी पीक निहाय राज्य पातळी प्रथम क्रमांक ५० हजार रुपये, द्वितीय क्रमांक ४० हजार रुपये, तृतीय क्रमांक ३० हजार, जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक १० हजार रुपये, द्वितीय क्रमांक ७ हजार रुपये, तृतीय क्रमांक ५ हजार , व तालुका पातळीवरील प्रथम क्रमांक ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक ३ हजार रुपये, तृतीय क्रमांक २ हजार अशी बक्षिसे देण्यात येणार आहे. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, संकेतस्थळ- www.krishi.maharashtra.gov.in किंवा आपल्या तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
विठ्ठल भीमा आवारी साकुर ता. इगतपुरी यांना तीन वर्षांपूर्वी गहू पीक स्पर्धेत राज्यस्तरावर प्रथम पुरस्कार मिळाला होता. त्यांचा सत्कार तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषी मंत्री दादा भुसे यांचे हस्ते झाला होता. त्यामुळे यावेळी देखील शेतकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद देऊन सहभाग नोंदवावा. - किशोर भरते, उप कृषी अधिकारी, इगतपुरी