
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील आदिवासी दुर्गम असणाऱ्या चिंचलेखैरे येथे तालुका कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत पौष्टिक तृणधान्य पिक प्रात्यक्षिक गटाला नागली बी बियाण्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून आधुनिक शेतीच्या तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले. अधिकाधिक उत्पादनासाठी योग्य पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन केले. मंडळ कृषी अधिकारी सागर सिनारे, उप कृषी अधिकारी महेश वामन, सहाय्यक कृषी अधिकारी कविता नाईक आदींनी आधुनिक कृषी पद्धती, योग्य बियाण्यांची निवड व पेरणीचे तंत्र यावर मार्गदर्शन केले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर योग्य वेळी योग्य पिक पद्धती निवडून जास्त उत्पादन मिळवण्याचा सल्ला देण्यात आला. या उपक्रमात गावातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.