शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश : शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर

इगतपुरीनामा न्यूज, दि. 30
ऑनलाईन शिक्षणासह सर्व बाबी पूर्ण झाल्याने शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी लिहलेल्या पत्रानंतर व फोनवरून चर्चा केल्यानंतर शिक्षण संचालक यांनी शुक्रवारी सायंकाळी शाळा, कॉलेजेसच्या मे महिन्याच्या सुट्टीबाबत परिपत्रक काढले आहे. वडिलांच्या निधनाने दुःखात असूनही शिक्षणमंत्री यांनी तातडीने या प्रस्तावाला मान्यता दिली, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली असून शिक्षणमंत्री आणि शिक्षण संचालक यांचे आभारही मानले आहेत.
एप्रिल महिना संपत आला, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षाही रद्द झाल्या मात्र तरीही शाळा, कॉलेजेसना मे महिन्याची सुट्टी मिळेल की नाही. याबाबत विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण होते. आमदार कपिल पाटील यांनी शिक्षण संचालक डी. जी. जगताप यांच्याकडे याबाबत पत्राद्वारे मागणी करून प्रत्यक्षात फोनवरूनही चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी तातडीने याबाबत परिपत्रक निघत आहे, असे सांगितले होते. आज तसे अधिकृत परिपत्रक निघाल्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणाशी संबंधित कामकाज पूर्ण केले आहे. काही ठिकाणी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे पगार वेळेवर नसतानाही कोरोनाबाबत वेळोवेळी दिलेल्या जबाबदाऱ्याही पार पाडल्या असून कोरोना आपत्तीबाबत मिळालेली ड्युटीही केलेली आहे. पुढील शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासाठी त्यांना वेळ मिळणेही आवश्यक आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन शाळा, ज्युनिअर कॉलेजेसना विहित पद्धतीने मे महिन्याची सुट्टी तात्काळ जाहीर करावी, अशी मागणी शिक्षक भारतीतर्फे करण्यात आली होती.
दरम्यान १ मे पासून शाळांना सुट्टी देण्याची कार्यवाही करावी असे परिपत्रक शिक्षण संचालक यांनी काढले असून या निर्णयाचे संघटनेचे राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, सरचिटणीस भरत शेलार, महिला आघाडीप्रमुख स्वाती बेंडभर, विभागीय अध्यक्ष राजेंद्र दिघे, राजेंद्र लोंढे, जिल्हाध्यक्ष प्रकल्प पाटील यांनी स्वागत केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!