
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील बिटुर्ली येथील भाऊ बुधा पारधी या आदिवासी कुटुंबाच्या घराला काही दिवसांपूर्वी आग लागून मोठे नुकसान झाले होते. मुलीच्या लग्नासाठी आणलेल्या वस्तू, घरातील जीवनावश्यक वस्तू खाक झाल्याने आदिवासी कुटुंबाच्या डोळ्यात पाणी आले. या घटनेमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली होती. अशा परिस्थितीत वाकीच्या ग्रामसेविका ज्योती केदारे, कृषी सहाय्यक रजनी चौधरी, ग्रामसंघाच्या सीआरपी सविता कडाळी या रणरागिनींनी सामाजिक उत्तरदायित्व दाखवून या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी आवश्यक वस्तू दिल्याने त्या कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाश्रू प्रगटले. घर जळाल्याचे शासनस्तरावर पंचनामेही करण्यात आले आहेत. ती मदत मिळेल तेव्हा मिळेल मात्र आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने त्यांना मदत करण्यात आली. आगग्रस्त कुटुंबाला आम्ही एक छोटीशी मदत केली याचे मनाला खूप समाधान वाटत असल्याचे ग्रामसेविका ज्योती केदारे म्हणाल्या. आदिवासी कुटुंबाने या रणरागिनींचे आभार मानले.