
इगतपुरीनामा न्यूज, दि. १८
इगतपुरी तालुक्यात अतिदुर्गम आदिवासी वाड्यावस्तीवरील आर्थिक परिस्थितीमुळे शैक्षणिक गरजा पूर्ण होऊ न शकणाऱ्या जिल्हा परिषद शाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांना दरवर्षी मुंबईच्या फॅन्ड्री फाऊंडेशनतर्फे मोफत संपूर्ण वर्षभराचे शैक्षणिक दिले जाते. “एक हात मदतीचा” हे ब्रीद वाक्य घेऊन नाशिक, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात आदिवासी बहुल जिल्हा परिषद शाळांमध्ये हे शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते. ह्या शैक्षणिक वर्षात इगतपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरुंगवाडी, धामडकीवाडी, गव्हांडे, सरदवाडी, पिंपळगाव घाडगा, पेहेरेवाडी, फोडसेवाडी, ठाकूरवाडी शाळांमध्ये साहित्य वाटप करण्यात आले.

फॅन्ड्री फाउंडेशनच्या संचिता धनवडे, विद्या पिकले, सुनंदा अग्निहोत्री, पुष्पा पै, भवानी राज यांच्या उपस्थितीत साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला. फॅन्ड्री फाउंडेशन मुंबई यांनी मागील वर्षी रत्नागिरी जिल्ह्यात पूरग्रस्त परिस्थितीत अडकलेल्या गावकऱ्यांना किराणा व संसारोपयोगी साहित्य वाटप केले. पालघर जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबांना फुल शेतीसाठी मदत केली. फॅन्ड्री फाऊंडेशनच्या सहकार्यामुळे आदिवासी भागातील शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्ता वाढली असून विद्यार्थ्यांना ज्ञानप्रवाहात मदत होत असल्याचे कौतुक राज्य आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी यांनी केले आहे.
