
इगतपुरीनामा न्यूज – कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने कावनई येथील सुनील दशरथ शिरसाठ व नारायण दामू रण आदी शेतकऱ्यांनी नियंत्रित भात लागवड केलेली आहे. नारायण रण वारकरी संप्रदायातील असल्याने त्यांनी भजन म्हणत भात लागवड केली. या भजनाने भात लागवड करणारे मजूरही मंत्रमुग्ध झाले. यामुळे भात लागवडीतील शारीरिक कष्टांचा विसर पडला. इगतपुरीचे तालुका कृषि अधिकारी रामदास मडके, मंडळ कृषी अधिकारी अजय खैरनार, उप कृषी अधिकारी आबासाहेब आटोळे, सहाय्यक कृषी अधिकारी शिवचरण कोकाटे यांचे मार्गदर्शन लाभले. दर बुधवारी ऑनलाईन भातपिकाची डिजीटल शेतीशाळा होत असते. तिची लिंक तालुक्यातील गावांच्या विविध व्हाट्स अप गृपवर पाठवण्यात येते. लिंकद्वारे वर्गास हजर राहुन शेतकरी बंधु भगिनींनी लाभ घ्यावा. पिक विमा योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी केले आहे.
यावर्षी साधारणपणे पाच मे पासून पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे राब भाजने, भाताची रोपे टाकणे या भात शेतीच्या कामांमध्ये विस्कळीतपणा आला. जी रोपे टाकून झाली ती सुद्धा सततच्या पावसाने मेली. त्यामुळे भात लावण्यासाठी रोपांची कमतरता यावर्षी जाणवत आहे. इगतपुरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत नेहमी चारसुत्री भात लागवड पद्धतीचा प्रचार व प्रसार केला जात आहे. चारसुत्री लागवडीतील एक सूत्र म्हणजे नियंत्रित लागवड होय. नियंत्रित लागवड पद्धतीत दोन-तीन भात रोपांची लागवड २५ बाय १५ सेंमी अंतरावर केली जाते. नियंत्रित लागवड केल्यामुळे प्रत्येक चुडांच्या मुळ्यांचा प्रसार जमिनीत होण्यासाठी पुरेशी जमीन उपलब्ध होऊन अन्नद्रव्यही उपलब्ध होतात. मुळाची वाढ जोमदार होते. लागवडीत अंतर ठेवले असल्याने हवा खेळती राहते. त्यामुळे रस शोषणाऱ्या किडी, मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव जाणवत नाही. युरिया ब्रिकेट खतही व्यवस्थित देऊन तण नियंत्रणही करता येते. हे सर्व फायदे सहाय्यक कृषी अधिकारी शिवचरण कोकाटे यांनी शेतकऱ्यांना व्हाट्सअप ग्रुप, प्रशिक्षणे व व्यक्तीश: नियमितपणे सांगितलेली आहेत.