
इगतपुरीनामा न्यूज – शेती आणि ग्रामीण जीवनाचा अत्यंत जवळून अभ्यास करणारे आणि आपल्या लेखणीतून शेतकरी प्रश्नांना वाचा फोडणारे पत्रकार लक्ष्मण बबन सोनवणे यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित ‘वसंतराव नाईक शेती मित्र’ पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे. कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. लक्ष्मण सोनवणे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून कृषी पत्रकारितेच्या माध्यमातून शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, यशस्वी प्रयोग आणि शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडण्याचे काम केले आहे. त्यांच्या या निष्काम आणि सामाजिक बांधिलकीच्या कार्याची दखल घेत शासनाने त्यांना या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवडले आहे. श्री. सोनवणे यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर होताच पत्रकारिता आणि कृषी क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया देताना लक्ष्मण सोनवणे यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणे हे मी माझे कर्तव्य समजतो. या पुरस्कारामुळे जबाबदारी अधिक वाढली असून, आगामी काळातही शेतकऱ्यांच्या हितासाठी माझे कार्य सुरूच राहील. “त्यांच्या यशाबद्दल इगतपुरी त्र्यंबकचे आमदार हिरामण खोसकर, खासदार राजाभाऊ वाजे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांच्यासह नाशिकचे विभागीय कृषी सह संचालक सुभाष काटकर, नाशिक जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र वाघ, इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके, मंडळ कृषी अधिकारी संजय पाटील, अजय खैरनार, उप कृषी अधिकारी किशोर भरते, किरण सोनवणे, सहायक कृषी अधिकारी हरिष चव्हाण आदींनी अभिनंदन केले आहे.