बिबट्या पाडतोय कुत्रे, वासरे व पाळीव प्राण्यांचा फडशा : तातडीने बिबट्या जेरबंद न केल्यास आंदोलन करण्याचा मुकणेकरांचा इशारा

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – काही दिवसांपूर्वी मुकणे कॉलनी येथील उपसरपंच भास्कर राव यांच्या घराजवळील पडवीत असलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली होती. वन विभागाकडुन बिबट्या जेरबंद झालेला नसुन त्याने आता कुत्रे, वासरे यांच्यावर हल्ला करीत आहे. ठार करीत आहे. आज पहाटे मारुती राव यांच्या टोमॅटो पिकात बिबट्याने पिकांची चांगलीच नासाडी केली असुन वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे बिबट्यांचा मानवी वस्तीत शिरकाव वाढला आहे. अनेकदा मागणी करुनही साधा पिंजरा लावण्याचीही तसदी वनविभाग घेत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. थायसन, जिंदाल कंपनी येथे नेहमीच आवर्जुन पिंजरे लावले जातात मग कंपन्यांसाठी इतकी मेहेरबानी व लोकवस्तीकडे डोळेझाक का..? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. मुकणे-कावनई रोडवरील शेतात शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला तेंव्हा सोपस्कार म्हणुन पिंजरा लावला होता मात्र त्यात शेळीच ठेवली नसल्याने बिबट्या पिंजऱ्याकडे फिरकलाही नसल्याचे आसपासच्या शेतकऱ्यांनी सांगितले. अजुन किती बळी द्यायचे आहे असा संतप्त सवाल मुकणे ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. मुकणे येथील बिबट्या पकडण्यासाठी तात्काळ पिंजरा लावुन त्यात शेळी ठेवण्याचीही व्यवस्था करावी अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मुकणेचे सरपंच हिरामण राव, उपसरपंच भास्कर राव, सदस्य मोहन बोराडे, गणेश राव, निवृती आवारी, ज्ञानेश्वर राव, सोसायटी संचालक गणेश राव, मारुती राव, गजिराम राव, रामभाऊ राव आदींसह मुकणे ग्रामस्थांनी दिला आहे.

error: Content is protected !!