
इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
दोन दिवसांपासून गोंदे दुमाला परिसरात अतिपावसाने थैमान घातलेले आहे. त्यामुळे सामान्य शेतकरी उध्वस्त झाले आहेत. पावसाच्या पाण्यामुळे अनेक शेतांचे नुकसान झालेले असल्याने शेतकरी कुटुंबांमध्ये रडकुंडी वातावरण आहे. गोंदे येथील नारायण गणपत धोंगडे, रंगनाथ चहादू राव या दोन शेतकऱ्यांच्या विहिरी धसून गेल्या आहेत. पावसामुळे ह्या दोन्ही विहिरी बुजल्या असल्याने ह्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहत आहेत. गोंदे दुमाला आणि परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच परशराम नाठे यांनी केली आहे.
दोन दिवसांपासून गोंदे दुमाला भागात ढगफुटी स्वरूपात पावसाने थैमान घातले. यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. यासह बागायती पिकांना फटका बसल्याने भांडवल सुद्धा वसुल होणे अतिशय अवघड आहे. त्यामध्येच रोज पुन्हा मुसळधार पाऊस येऊन नुकसानीमध्ये भरच पडते आहे. गोंदे दुमाला येथील नारायण गणपत धोंगडे, रंगनाथ चहादू राव या दोन शेतकऱ्यांच्या वापरातील पाण्याच्या विहिरी पावसाच्या अतिरिक्त पाण्यामुळे बुजून गेल्या आहे. सगळ्याच विहिरीची अवस्था धसल्यासारखी झाल्याने विहिरी निरूपयोगी ठरल्या आहेत. यामुळे ह्या शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागते आहे. यासह ह्या भागातील शेकडो शेतकऱ्यांना नुकसानीमुळे अत्यंत मोठा फटका बसला आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच परशराम नाठे यांनी केली आहे.