आता माघार नाही ; कंपनीचे गेट बंद करण्याचे तहसीलदारांना निवेदन
इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
मुंढेगाव येथील अनेक वर्षांपासून बस्तान मांडून बसलेल्या जिंदाल कंपनीने स्थानिक बेरोजगार युवकांवर नेहमीच अन्याय केलेला आहे. वेळोवेळी स्थानिक नागरिकांनी केलेल्या आंदोलनांना कंपनीने कायमच केराची टोपली दाखवली आहे. जिंदाल कंपनी प्रशासनाने कंपनीतील एकूण कामगारांपैकी ८० टक्के स्थानिक बेरोजगार युवकांना कामावर घ्यावे. स्थानिकांवरचा अन्याय दूर करावा. अन्यथा आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा इशारा इगतपुरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. आता कोणत्याही परिस्थितीत स्थानिक बेरोजगारांना कामावर घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद केलेले आहे.
काँग्रेस कमिटी इगतपुरी तालुक्याच्या वतीने दिलेल्या निवेदनाचा आशय असा आहे की, इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीमध्ये स्थानिक बेरोजगार तरुणांना कामावर घ्यावे ही फार जुनी मागणी आहे. शेकडो वेळा निवेदन सुद्धा देण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून जिंदाल कंपनी इगतपुरी तालुक्यात असून वेळोवेळी स्थानिक लोकांनी आवाज उठवला. परंतु कंपनीने लोकांना वेड्यात काढून स्थानिक लोकांवर अन्याय केला. परंतु आता माघार घेण्यात येणार नसून आंदोलन हे तीव्र स्वरूपाचे करण्यात येईल. ह्या पार्श्वभूमीवर कंपनीने ८० टक्के स्थानिक युवकांना तातडीने कामावर घ्यावे. निवेदन देतेवेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग जनार्दनमामा माळी यांनी तहसीलदार यांना आक्रमक भूमिका सांगितली. काँग्रेस कमिटी इगतपुरी तालुक्यातर्फे तीव्र आंदोलन करून कंपनीचे गेट बंद करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभाग उपाध्यक्ष जनार्दनमामा माळी, ॲड. जी. पी. चव्हाण, सरचिटणीस लक्ष्मण उर्फ लकी जाधव, रामदास धांडे, बाळासाहेब लंगडे, ज्ञानेश्वर कडू, प्रकाश तोकडे, संतोष जगताप, संतोष सोनवणे, बाबू कौटे,राजू गांगड, निवृत्ती कातोरे, कमलाकर नाठे, संदीप गवारी, विजय झनकर, पंढरीनाथ लंगडे, गणपत लंगडे, महेश भगत, राहुल भगत, अर्जुन आडोळे, गुलाब कडू, सतीश कर्पे, बाळासाहेब धुमाळ, किशोर चौधरी, शरद लंगडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.