आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवी यांचे निधन : तळागाळातील सर्वसामान्य माणसाचा आवाज काळाच्या पडद्याआड 

इगतपुरीनामा न्यूज – आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते, आगरी सेनाप्रमुख, महाराष्ट्र राज्य ओबीसी महामंडळाचे प्रथम अध्यक्ष राजाराम साळवी यांचे आज सायंकाळी ५.३० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच आगरी समाजासह सर्व सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांमध्ये, जनमाणसांत शोककळा पसरली आहे. राजाराम साळवी यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात आगरी समाजासह सर्व बहुजनांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष केला. मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, पालघर, नाशिक, मध्यप्रदेशातील काही भागांमध्ये आगरी सेना बहुजनांच्या हितासाठी कार्यरत असून या व्यापक संघटनात्मक कार्याचे नेतृत्व साळवी यांनी अनेक वर्षे यशस्वीपणे केले. त्यांच्या नेतृत्वाखाली आगरी सेना ही केवळ एक संघटना न राहता समाजातील सर्वसामान्यांचा आधारवड बनली. महाराष्ट्र राज्य ओबीसी महामंडळाचे प्रथम अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी सामाजिक न्याय, समता आणि वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. समाजातील दुर्बल घटकांच्या प्रश्नांना शासन दरबारी प्रभावीपणे मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. साळवी यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केवळ नेतृत्व केले नाही, तर अनेक नेते घडवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यकर्ते समाजकारण आणि लोकसेवेच्या क्षेत्रात पुढे आले. आज विविध भागांत कार्यरत असलेले अनेक सामाजिक व राजकीय नेते हे त्यांच्या विचारांनी आणि कार्यपद्धतीने प्रेरित झालेले आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत हे कार्यकर्ते लोकसेवेसाठी झुंजत राहतील, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

तळागाळातील सर्वसामान्य माणसाच्या उन्नतीसाठी त्यांनी नेहमीच मूलमंत्र दिला. समाजातील युवकांना शिक्षण, संघटन आणि स्वाभिमानाचा मार्ग दाखवला. अनेक कुटुंबांचे प्रश्न सोडवले, अनेकांना न्याय मिळवून दिला, अनेक संसार उभे करण्यासाठी मदतीचा हात दिला. समाज चुकीच्या मार्गाला जाऊ नये, समाजात एकोपा आणि सामाजिक बांधिलकी टिकून राहावी यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. आगरी समाजाच्या अस्मितेचे रक्षण, सामाजिक एकजूट, शैक्षणिक प्रगती आणि हक्कांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला. त्यांच्या स्पष्टवक्तेपणा, दूरदृष्टी, संघटन कौशल्य आणि जनसामान्यांप्रती असलेल्या आत्मीयतेमुळे त्यांना समाजात विशेष मानाचे स्थान प्राप्त झाले होते. त्यांच्या निधनामुळे आगरी समाजाने एक दूरदर्शी नेता, समाजहितासाठी आयुष्य वेचलेला लढवय्या कार्यकर्ता, मार्गदर्शक आणि अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांचे कार्य, विचार आणि संघर्षाची परंपरा पुढील अनेक वर्षे समाजाला दिशा देत राहील. त्यांच्या निधनाबद्दल विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि बहुजन चळवळीतील मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

बातमीचे कात्रण बनवा 

error: Content is protected !!