
इगतपुरीनामा न्यूज – पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अनेक महिला त्यांच्या बरोबरीने आत्मनिर्भर होत असल्याचे उत्साहवर्धक चित्र समाजात पाहायला मिळते. परंतु जेंव्हा एखादी महिला केवळ घरच नव्हे, तर दुर्गम भागातील हजारो शेतकऱ्यांचेही जीवन उजळवण्यासाठी अहोरात्र झटते, तेव्हा ती खऱ्या अर्थाने समाजाची प्रेरणामूर्ती ठरते. अशीच परिस्थितीवर धाडसाने मात करीत, इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम आणि आव्हानात्मक भागात सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून अत्यंत निष्ठेने, चिकाटीने, समर्पणाने कार्यरत कविता सुनील पवार – नाईक या शेतकरी बांधवांच्या हितासाठी अतिशय महत्त्वपूर्ण व कौतुकास्पद भूमिका बजावत आहेत. त्यांची कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि शेतकऱ्यांप्रति असलेली तळमळ हे त्यांच्या कार्याचे खरे बळ आहे. या अमूल्य कार्यात त्यांना इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके, मंडळ कृषी अधिकारी राजेंद्र काळे आणि उप कृषी अधिकारी महेश वामन यांचे अनुभवी व प्रेरणादायी मार्गदर्शन मिळते. त्यामुळे त्यांच्या कार्याला अधिकच बळकटी आली आहे. शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचण्याचा त्यांचा ध्यास असून, त्यांच्या कार्यक्षेत्रातील इगतपुरी शहर, तळेगाव, चिंचलेखैरे, आवळखेड या ठिकाणी कृषी क्षेत्राविषयी जागृती, प्रचार व प्रसार करून त्यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी अत्यंत मोलाचे आणि व्यावहारिक मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळे आणि समर्पित सेवेमुळे या भागातील शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष लाभ मिळाला असून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून आला आहे. अनुभवाची शिदोरी घेऊन २०१४ साली कृषी सहाय्यक म्हणून बेलगाव कुऱ्हे येथून आपल्या करिअरची सुरुवात करताना त्यांनी अत्यंत जिद्दीने, कुशलतेने आणि उत्साहाने चोख कामगिरी बजावली. दशकभराच्या अनुभवातून त्यांनी जे ज्ञान, कौशल्य आणि संवेदनशीलता आत्मसात केली ती आज त्यांच्या प्रत्येक कार्यात झळकते. त्यांचे मूळ मोहाडी, ता. पाचोरा, जि. जळगाव येथील शेतकरी कुटुंबात जन्म घेतल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या दैनंदिन संघर्षाची, वेदनांची आणि अपेक्षांची सखोल जाणीव आहे. ही संवेदनशीलता त्यांना इतर अधिकाऱ्यांपेक्षा वेगळे ठरवते. “माझ्या शेतकऱ्यांसाठी” हा एकच ध्यास मनात बाळगून त्या प्रत्येक योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. या प्रेरणादायी प्रवासात त्यांचे आई-वडील आणि पती यांचे वेळोवेळी मिळणारे प्रेमळ मार्गदर्शन आणि भक्कम पाठबळ त्यांच्यासाठी मोठे आधारस्तंभ ठरले आहेत. कविता पवार नाईक यांनी शेतकऱ्यांसाठी विविध महत्वाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यात आघाडीची भूमिका बजावली आहे. फळबाग लागवड, शेतकऱ्यांना फळबाग उभारण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन, शेतकरी अपघात विमा, विम्याचे लाभ मिळवून देण्यासाठी तत्पर प्रयत्न, पंचनामा व नुकसान भरपाई, नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना त्वरित दिलासा, ट्रॅक्टर व औजारे, आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांपर्यंत प्रसार बियाणे व औषधे, दर्जेदार निविष्ठांची उपलब्धता सुनिश्चित करणे, शेतकरी प्रशिक्षण, ज्ञानसंपन्न शेतकरी घडवण्याचे अभियान, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, ग्रामीण उद्योजकतेला चालना, AgriStack फार्मर्स आयडी, डिजिटल शेतकरी नोंदणी, महाविस्तार AI ॲप, कृषी तंत्रज्ञानाचा स्मार्ट वापर, महिला बचत गट, महिला सशक्तीकरणाला बळकटी, कृषी विभागाच्या विविध योजना एकूण शेतकरी कल्याणासाठी सर्वंकष प्रयत्न केला आहे. आदर्श गृहिणी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी दोन्ही भूमिका त्यांनी समर्थपणे पेलावल्या आहेत. सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून शेतकऱ्यांसाठी अहोरात्र झटणाऱ्या कविता सुनील पवार नाईक या एक उत्कृष्ट गृहिणी देखील आहेत. घरी दोन मुलांचे संगोपन आणि पतींची काळजी घेत, त्याचवेळी व्यावसायिक जीवनात देखील आपला ठसा उमटवणाऱ्या कविताताई खऱ्या अर्थाने “सुपरवूमन” आहेत. कविता सुनील पवार नाईक यांचे हे कार्य केवळ एका सरकारी अधिकाऱ्याचे कर्तव्यपालन नसून, शेतकऱ्यांप्रतीच्या खऱ्या प्रेमाचे आणि सेवेचे जिवंत प्रतीक आहे. त्यांच्यासारख्या ध्येयनिष्ठ, धाडसी आणि कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्यांमुळेच कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळत आहे. इगतपुरी तालुक्यातील शेतकरी बांधव त्यांच्या या अमोल सेवेसाठी कृतज्ञ आहेत आणि भविष्यातही त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतात.