पंढरीची वारी आणि वारकरी संप्रदाय

लेखन – जगद्‌गुरु द्वाराचार्य डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर, नाशिक

महाराष्ट्राचे आध्यात्मिक, पारमार्थिक महत्वपूर्ण वैशिष्टे म्हणजे ‘पंढरीची वारी’. महाराष्ट्रात भीमानदीच्या तीरावर असणाऱ्या लोकविख्यात पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपूर क्षेत्राचे अधिष्टातृ‌दैवत जे ‘पांडुरंग’ किंवा ‘श्रीविठ्ठल’ या नावाने ओळखले जाते, त्याच्या दर्शनासाठी नित्यनियमाने येणाऱ्या भाविकाला ‘वारकरी’ असे म्हणतात. पंढरी क्षेत्रात नियमित येऊन विठ्ठलदर्शनाचे गुरुपरंपरेने उपासना स्वरुपात वारीचे असे म्हणतात. ‘वारकरी’ हा शब्द वारीकरी या शब्दाचा अपभ्रंश असावा, जो मूळ वारीकर या शब्दांपासून आलेला आहे. संत ज्ञानोबा यांच्या अंभगात वारीकर हा शब्द याच अर्थाने येतो. “काया वाचा मने जीवे सर्वस्व उदार | बाप रखुमादेवीवर विठ्ठलाचा वारीकर।।” ‘वारी’ म्हणजे नियमित येणे व जाणे-येरझार करणे. आपल्या इष्टदेवतेच्या दर्शनासाठी येरझार करणारा तो वारीकर अमरकोशात ‘वार’ या शब्दाचा ‘समुदाय’ अगर ‘संघात’ असा अर्थ दिला आहे. या अर्थाने वारकरी हा एका समुदायाचा, संघाचा घटक असतो. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीतही ‘वारी’ शब्द निरनिराळया संदर्भाने वापरला आहे. महाराष्ट्रात जेजुरीच्या खंडोबाची कोल्हापूर जवळ ज्योतीबाची, तुळजापुरच्या अंबाबाईची देखील वारी करणारा वर्ग आहे. परंतू वारकरी म्हणजे पंढरीचा वारकरी असा अर्थ विशेषरित्या रुढ होत गेला आहे. आज या संप्रदायाचे महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर आंध्र, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश इत्यादी प्रांतात देखील उपासक असून यांची संख्या कोटीने आहे. पंढरीशी संबंधित आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री या चार प्रमुख व दर महिन्याच्या शुद्ध दशमी, एकादशी व द्वादशीस संयुक्त अशी मासिक वारी करणारे वारकरी देखील आहेत. या संप्रदायाला अद्वैत तत्वज्ञानाचा वेदांतयुक्त संतवाङ् मयाचा, अभंग, अवीट व अविचल असा पाया लाभत आहे. याचे अधिष्टातृदैवतही तितकेच सरळ, सहज व सर्वांना आश्रय देणारे आहे. संप्रदायाचे तत्वज्ञानही सर्मसमावेशी व सर्वांना भक्ती-ज्ञान कर्मोपासनेचा अधिकार आहे, हे सांगणारे आहे.

यालाच ‘भागवतधर्म’ असे नांव महाराष्ट्रात प्रचलित आहे संप्रदायाचे उपास्यदैवत ‘श्री विठ्ठल’ हे गोपाळकृष्णाचे बालरुप मानले जाते. ‘भोळी बाळमूर्ती पांडुरंग।’ श्रीकृष्णांस तुलसीदल अत्यंत, प्रिय या तुळशीलकाष्टांपासून तयार केलेली मेरुमण्यासह असणारी १०८ मण्यांची तुळशीमाळ प्रत्येक वारकरी श्रद्धापूर्वक, निष्टेने आपल्या गळ्यात घालतो. या लक्षणाने या संप्रदायाला टिळा लावणे, तुळशीकाष्ठ माळ धारण करणे संतवाङ् मयाचा नित्यपाठ ‘हरीपाठ’ म्हणणे व एकादशीव्रत करणे हे सोपे नियम या उपासकांना आहेत. मद्य -मांसाहार-व्यभिचार आणि पापाचरणाचा निषेधही संप्रदायाच्या आचार-विचारात केला आहे. जगद्‌गुरु आद्य शंकराचार्यानी आपल्या शांकरभाष्यात ज्यांचे खंडन केले तो भागवतधर्म द्वैती असून ‘वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न  व अनिरुद्ध चर्तुव्यूह कल्पना त्यात प्रमुख आहेत.’ द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याचे बाळरुप हे श्रीविठ्ठलरुपाने उपास्यदैवत असल्याने हा ‘वैष्णव संप्रदाय आहे. वेद, स्मृती, उपनिषद, षड्दर्शन, पुराणादि, इतिहासग्रंथ, श्रीमद्भागवत, भगवतगीता तसेच ज्ञानोबाराय, नामदेवराय, एकनाथ महाराज, तुकोबाराय व निळोबाराय इ. सर्व विठ्ठलभक्त वैष्णव संताचे वाङ्मय या सांप्रदायिकांना प्रमाण आहे. सगुणोपासना, नामस्मरण, हरीकिर्तन सर्वात्मभाव, आत्मसमर्पण, अनन्य शरणागती गुरुकृपा इ. भागवताच्या एकादश स्कंधात सांगितलेली भागवत श्रेष्ठाची लक्षणे ही वारकऱ्यांचीही लक्षणे ठरतात. भक्ती हे वारकरी भागवतधर्माचे सारभूत तत्व आहे आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या व्यक्ती तत्व वा शक्तीची सापेक्ष किंवा निरपेक्षभावाने अंत:करणापासून केलेली अखंड सेवा म्हणजे भक्ती उपासक उपास्य व उपासना किंवा भज्य-भजक भक्ती अशी त्रिपुटी यात आढळते. शुद्धभक्ती मागाचा प्रसार करीत धार्मिक क्षेत्राशी संबंधित जागृती बरोबरच तद्अनुषांगिक समाजिक व वाड्ःमयीन कार्य देखील या उपासकांनी केलेले दिसते

वारकरी संप्रदाय हा पथ वैदिक धर्माविरुद्धचे बंड नसून त्यातीलच प्रागतिक स्वरुप आहे. या संप्रदायातील उपासक संतांच्या वाड्:मयप्रमाणातून येणारी अनेक प्रमाणे हा वैदिक परंपरेतील संप्रदाय आहे हे सिद्ध करतात. आपल्या वैदिक सनातन धर्म परंपरच्या मूळ स्वरुपाला धक्का न लावता स्वतःचा सर्वाननुकूल सर्वसमन्वयक विस्तार, वारकरी संप्रदयाने केलेला दिसतो. या पंथाच्या अनुयायी व मार्गदर्शक संतांनी वेदांचे प्रामाण्य मान्य केले. जो आचार विचार आम्ही करतो तो वैदिक आचार असून जो वेदशास्त्रदिकांचे प्रमाणांना मानीत नाही. तो पाखंडी आहे. असे वारकरी संतांनी स्पष्ट केले आहे. ज्ञानोबाराय म्हणतात- “या कारणे पै बापा। जया आधीचे आपुली कृपा ।। तेणें वेदाचिया निरोपा आन न कीजे।।” (ज्ञाने. १६-४५५) “वेदशास्त्रप्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप ।।” (ज्ञा.म. हरिपाठ अभंग १९), तुकोबाराय म्हणतात- “वेदा निंदी तो चांडाळ।” भ्रष्ट सुतकीया खळ ॥ २ ।। (तु.मं.अ.१३४५), वेदशास्त्र नाही पुराणप्रमाण तयाचे वदन नावलोका ।। (तु.मं.अ.२१८६) या प्रमाणांवरुन वारकरी संप्रदाय हा वैदीक संप्रदाय आहे हे स्पष्ट होते. मात्र या संप्रदायाचा आरंभ केंव्हा झाला असे कालगणनेच्या आधारे सांगता येत नाही. हा मुळ वेदांस चिकटून असणारा व तितकाच प्राचीन संप्रदाय आहे. कारण उपलब्ध ऐतिहासिक शिलालेखांवरुन व इतर पुराव्यांवरुन नामदेवराय ज्ञानोबारायांच्या ही अगोदर या संप्रदायाचे अस्तित्व होते हे सिद्ध झाले आहे. 

वारकऱ्यांची उपासना ही पांडुरंगाभोवती केंद्रीत असली तरी वारकरी संप्रदायाचा इतिहास व मुर्तीचा वा क्षेत्राचा इतिहास याचा संबंध मनानेच जोडता येत नाही. नामदेवराय ज्ञानोबारायाच्या पूर्वकाळातही दोन वेळा यात्रा भरत होती. हे “आषाढी कार्तिकी विसरु नका मज सांगत तसे गुज पांडुरंग।।” या नामदेवरायांच्या प्रमाणावरुन सिद्ध होते. आद्य शंकराचार्याच्याही खोतातून पांडुरंगाष्टकातून पंढरी क्षेत्र व पांडुरंगाचा उलेख आलेला पहावयास मिळतो. सगुण उपासनेमध्ये नाम, रुप, लिला आणि धाम या चार गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यापैकी ‘धाम’ म्हणजे देवाचे देवाचे वास्तव्य असणारे पवित्र ठिकाण पंढरपूर या पवित्र धामास जाण्याची वारीची प्रदिर्घ पंरपरा आहे. ‘जिये मार्गीचा कापडी महेशु’ या ज्ञानोबारायाच्या वचनाप्रमाणे या परंपरेचे आदय वारकरी आहे हे सूचित होते. वारऱ्याच्या समष्टी म्हणजे सामुदायिक साधना सोहळयाची सुसंबंध रचना ज्ञानदेवानी केली वारी ही वारकरी पंथातील प्रत्येक व्यक्तीसाठी पर्वणीच आहे. “माझ्या जीवाची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी।।” हेच वारकऱ्यांचं हृदयगत आहे. भक्तीसाधनेत ‘अभिगमन’ ही एक किया होय. म्हणजेच आपल्या आराध्याकडे पायी चालत जाणे. वारी म्हणजे केवळ दोन ठिकाणामधील अंतर कापणे नव्हे तर वाचिक, कायिक, मानसिक तपाचरण करणे आवश्यक ठरते. ‘नाचत जाऊ त्याच्या गावारेखेळिया’ असं वारकरी परस्परांना म्हणतात. वारीच्या वाटने मनाने कोणत्याही भौतिक गोष्टीचे चिंतन घडू नये वाचेने इतर काही वदू नये. किंबहुना आपला जीवभाव हा केवळ प्रभु असावा अशी वारी व वारकरी ज्ञानोबारायांना अपेक्षित आहे. विश्वबंधुत्वाची व्यापक संकल्पना म्हणजेच ‘पंढरीची वारी’ होय. या पंढरीच्या वारी निमित्ताने सर्व वारकऱ्यांना मंगलमय शुभेच्छा देतो. 

error: Content is protected !!