
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरणावर आज आक्रमक आणि थरारक आंदोलन घडून आलं. मुंबईला होणारा पाणीपुरवठा रोखण्यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेचे पदाधिकारी आणि महिलांनी धरण परिसरात जोरदार आंदोलन छेडले. एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे, कोषाध्यक्ष सुरेखा मधे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असलेलं हे आंदोलन अचानक तीव्र झालं, जेव्हा संघटनेच्या महिला आणि कार्यकर्त्यांनी थेट वैतरणा धरणाच्या मुंबईकडे जाणाऱ्या कॅनॉलमध्ये उड्या मारल्या. हा धक्कादायक प्रकार घडताच प्रशासनालाही भान आलं आणि जलसंपदा विभागाने तत्काळ कॅनॉलमधून मुंबईकडे जाणारा पाणीपुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला. एल्गार संघटनेचा आरोप आहे की, आदिवासी पाड्यांना अजूनही शुद्ध आणि पुरेसं पाणी मिळत नाही. वारंवार निवेदने देऊनही स्थानिक जलसमस्या तसेच जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये अपारदर्शकता आणि दिरंगाई असल्याची तक्रार संघटनेने केली आहे. “जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” असा ठाम पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. इतकंच नव्हे, तर मागण्या मान्य न झाल्यास वाहत्या पाण्यात उड्या टाकण्यास भाग पाडलं जाईल, अशी तीव्र चेतावणी आंदोलकांनी दिली आहे. सध्या धरण परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच एल्गार कष्टकरी संघटनेचे पदाधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये सविस्तर चर्चा सुरू आहे. प्रशासनाकडून समाधानकारक तोडगा निघतो का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. व्हिडिओ बातमी पहा