प्रस्थापित लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेच्या पायाखाली चिरडले जाताहेत पाणी मागणारे आदिवासी बांधव : ३ किमी डोंगरदऱ्या चढून उतरून जिजाऊ, सावित्रीच्या लेकी करताहेत पाण्यासाठी संघर्ष

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – लाखो लोकांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून बांधलेल्या धरणासाठी जमीन अन डोक्यावरचे छप्परही गेले. ज्यांच्या जमिनी ह्या धरणासाठी गेल्या त्या आदिवासी बांधवांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी आटापिटा करून संघर्ष करावा लागतोय. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे अनेक सभा समारंभ आणि सोहळ्यामध्ये कायम व्यस्त असल्याने त्यांना इगतपुरी तालुक्यातील गंभीर प्रश्नांचा विसर पडलेला आहे. भाम धरणाच्या माथ्यावरील दरेवाडी येथील आदिवासी महिला भगिनींच्या दुःखाला तर अजिबात अंत नाही. ह्या महिला आपल्या चिमुकल्या लेकरांना सोबत घेऊन जंगलातून डोंगर दऱ्या उतरतात. ३ किमी अंतरावरील भाम धरणातुन पिण्यासाठी हंड्यात पाणी भरून परत डोंगरदऱ्या चढुन येतात. खाचखळग्यांच्या खडकाळ पायवाटेने पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना जीवघेणे कष्ट सोसावे लागताहेत.

जिजाऊ आणि सावित्रीच्या लेकी म्हणून कोडकौतुक होणाऱ्या शाळकरी चिमुकल्या विद्यार्थिनीही डोक्यावर हंडे घेऊन आपल्या आईला मदत करतात. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे पाणी आटले, वाडीतील विहिरीनेही तळ गाठला असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. सकाळी सकाळी लवकर व सायंकाळी मजुरीच्या कामावरून आल्यानंतर महिलांना आपल्या लेकराबाळांसह पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. जंगलातून येताना जाताना वन्य प्राण्यांची भिती असल्याने आपला जीव धोक्यात घालून पाण्यासाठी जगण्याचा प्रयत्न होतोय. मतांचा जोगवा मागणारे आणि बोलबच्चन देऊन लोकांना भुलवणारे प्रस्थापित लोकप्रतिनिधी ह्या प्रकरणी सपशेल अपयशी ठरले आहेत. लोकांच्या जीवनमरणाच्या प्रश्नावर चुप्पी साधल्याने लोकांच्या तोंडात शिव्याशाप येत आहेत. तालुका प्रशासनही उदासीन असल्याने या भागातील लोकांना सध्या कोणी वाली नसल्याचे दिसतेय. व्हिडिओ पहा – https://youtu.be/nx4_0Y9E_CA

error: Content is protected !!