वैतरणात ३ जण बुडाले ; इगतपुरी ठरतेय “घातपुरी” : प्रशासनाकडून शोध आणि बचावकार्य सुरु

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात पाण्यात बुडणे आणि अपघातांचे सत्र सुरूच आहे. इगतपुरी आता अपघातपुरी आणि घातपुरी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अपघात आणि पाण्यात बुडाल्याच्या घटनांमध्ये अनेकांचा अंत झाला आहे. रविवारी दुपारी वैतरणा धरणात मुंबईचे ३ पर्यटक बुडाले असल्याची घटना घडली आहे. मागील आठवड्यात एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच ही घटना घडली आहे. घोटी पोलिसांनी स्थानिक नागरिक आणि माहितगार व्यक्तींकडून शोधकार्य सुरु केले आहे. मुंबईला पाणी पुरवठा वेगात आणि जास्त प्रवाहाने होत असल्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. पाणी बंद करण्याचे अधिकार मुंबई मनपाला असल्याचे स्थानिक यंत्रणेने सांगितले. धरण परिसरातील झारवड शिवारात २ जण बुडाले तर एक जण वावी हर्ष शिवारात बुडाल्याची माहिती समोर येत आहे. बचाव पथक शोधकार्य करण्यासाठी रवाना झाले आहे. अद्याप बुडालेल्या व्यक्तींची नावे समजली नाहीत. धोकादायक ठिकाणी पर्यटकांनी जाऊ नये आणि खोल पाण्यात उतरू नये. स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटकांनी मदत घ्यावी. पाण्याचा खोलीचा अंदाज घेऊनच पाण्यात उतरावे. वैतरणा नदी अति खोल असल्याने अशा धोकादायक ठिकाणी पर्यटकांना बंदी घालावी अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांनी केली आहे.

Similar Posts

error: Content is protected !!