एकीकडे ६ किमी डोंगराळ पायवाटेने गर्भवतीला ३ महिलांनी डोलीतून नेले दवाखान्यात तर दुसरीकडे स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष : आदिवासी भागातील वाड्यावस्त्यांचे रस्ते कधी होणार ? स्वातंत्र्य कधी मिळणार ?

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या अतिदुर्गम भागात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानंतरही रस्त्यांची समस्या आदिवासी नागरिकांच्या मुळाशी उठली आहे. इगतपुरी तालुक्यात मागील महिन्यात जुनवणेवाडी येथे रस्ता नसल्याने गर्भवती महिलेचा बाळासह मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खैराय किल्याच्या पायथ्याशी असलेल्या माचीपाडा येथे रस्त्याची सोय नसल्याने चक्क ६ किलोमीटर डोली बांधून त्यामध्ये टाकून गर्भवती महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत आशासेविका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी पोहोचवल्याची घटना घडली आहे. डोंगराळ भाग असल्याने अनेक अडचणी आल्या असल्या तरी महिलांनी त्यावर मात केली. संबंधित गरोदर महिलेचा जीव वाचला असून बाळ सुद्धा सुरक्षित आहे. प्रशासनाला त्यांचे वाभाडे निघण्यापासून आशासेविका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी वाचवले आहे. एकीकडे भारतीय स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा होत असतांना आदिवासी गर्भार महिलेला डोली करून दवाखान्यात नेण्याची घटना गंभीर आहे. रस्ते नसलेल्या वस्त्या, वाडेपाडे शोधून त्यावर प्रभावी उपाय योजावे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

खैराय किल्याच्या पायथ्याशी असलेल्या माचीपाडा वस्तीची लोकसंख्या अवघी १५० आहे. येथे सरला ज्ञानेश्वर बाम्हणे वय २० ही ८ महिन्याची गर्भवती महिला आहे. १४ ऑगस्टला अचानक तिचे पोट दुखायला लागले. याबाबत आशासेविका मंगल अंबादास सुबर, अंगणवाडी सेविका भारती रामदास गावित, मदतनीस तुळसा भगवान सापटे यांना माहिती समजली. वस्तीपासून ठाणापाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर ६ किलोमीटर आणि डोंगराळ आहे. रस्त्याची सोय नसल्याने पायी जाण्याशिवाय पर्याय नव्हता. तातडीने महिलेवर उपचार व्हावेत यासाठी तिन्ही महिलांनी दोन लाकडाला डोली बांधून त्यामध्ये गर्भवती महिला नेण्याचा एकमुखी निर्णय घेतला. डोंगरी भागातील सहा किलोमीटर पायवाटेची पायपीट करून तिघी महिलांनी सदर मातेला आरोग्य केंद्रात दाखल केले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला रात्रीच्या वेळी ही महिला प्रसूत झाली. माता आणि बाळ दोन्हीही सुरक्षित आहे. आशासेविका मंगल अंबादास सुबर, अंगणवाडी सेविका भारती रामदास गावित, मदतनीस तुळसा भगवान सापटे यांच्या प्रयत्नांमुळे महिलेचा आणि बाळाचा जीवन बचावला आहे. तिन्ही रणरागिणीच्या कामाचे सगळीकडे कौतुक करण्यात येत आहे.

Similar Posts

error: Content is protected !!