

इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ – गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातले असून इगतपुरी तालुक्यात अनेक गावांमध्ये गारपीट सदृश्य अवकाळी पाऊस झाला आहे. आज सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान मुरंबी येथील शेतकऱ्यांच्या घराजवळ वीज पडून एक बैल आणि म्हशीचे पारडू ठार झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर शेतीमालाचे नुकसान केले आहे. गहू, हरभरा, कांदे, द्राक्षबागा व इतर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आज सकाळी तालुक्याच्या विविध भागासह वाडीवऱ्हे, मुरंबी, सांजेगाव या परिसरामध्ये विजेचा गडगडाट होत होता. मुरंबी येथील शेतकरी शिवराम गणपत मते यांच्या भंबाळे फाटा येथील शेत वस्तीवर सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान वीज कोसळल्याने घराजवळच बांधलेले एक बैल व एका म्हशीचे दीड वर्षाचे पारडू ठार झाले. यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. मुरंबीचे सरपंच, उपसरपंच तलाठी व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी जागेवर जाऊन पाहणी करून पंचनामा केला. अवकाळी पावसाने पिकांबरोबरच शेतकऱ्यांच्या जनावरांवरही घाला घातल्याने शेतकरी नुकसान भरपाईची मागणी करत आहेत. यावेळी पंचनामा करतेवेळी घटनास्थळी मुरंबीचे सरपंच बापू मते, माजी उपसरपंच संतोष मते, सामाजिक कार्यकर्ते भास्कर त्र्यंबक मते, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश नेहते, कोतवाल सुधाकर गोवर्धने आदी उपस्थित होते.

