घोटीच्या दुर्गानगरातील ५० ते ६० कुटुंबांचा रस्ता बंद : शाळकरी विद्यार्थ्यांची धोकादायक रस्त्याने पायपीट : महसूलमंत्र्यांसह जिल्हाधिकारी, तहसीलदार आदींकडे नागरिकांची तक्रार 

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील घोटी बुद्रुक येथील दुर्गानगर परिसरातील सुमारे ५० ते ६० कुटुंबांच्या येण्या-जाण्याच्या रस्त्यावरून वाद निर्माण झाला आहे. वहीवाट असणारा रस्ता खोदून ठेवला असल्याने ह्या भागातील अनेक चिमुकले शाळकरी विद्यार्थी जीव धोक्यात घालून ह्या रस्त्याने शाळेत जातात. काही व्यक्तींकडून हा रस्ता कायमस्वरूपी बंद केला जाणार असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. याप्रकरणी पीडित नागरिकांनी राज्याचे महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सामूहिक तक्रार अर्ज करून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. तक्रार अर्जाची प्रत इगतपुरीचे आमदार, नाशिकचे जिल्हाधिकारी, इगतपुरीचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत आणि पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. या अर्जावर कांताबाई भिवा मोंढे, मंगेश रामदास जाधव, येणू लक्ष्मण भागडे, अरुण लक्ष्मण भागडे, भोरा पुनाजी केकरे, हिराबाई लक्ष्मण मेमाणे, गंगू गोविंद वारघडे, रघु धर्मा कडाळे, आनंदा वाळू घारे, विजय संतू घारे यांच्यासह अनेक नागरिकांच्या सह्या आहेत.

तक्रार अर्जात नमूद केल्यानुसार घोटी ग्रामपंचायत हद्धीतील दुर्गानगर परिसरातील नागरिक गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून संबंधित रस्त्याचा वापर करत आहेत. तत्कालीन जागा मालकांनी हा रस्ता सर्वांसाठी जाण्या येण्यासाठी खुला असल्याचे नागरिकांना सांगितलेले आहे. मात्र रस्त्यासाठी आता प्रत्येक घराकडून एक ते दीड लाख रुपयांची मागणी करण्यात येत असून पैसे न दिल्यास रस्ता कायमस्वरूपी बंद करण्याचा इशारा दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तींनी पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन तोडल्याचा, रस्त्यामध्ये मोठा खड्डा खोदून वाहतूक अडवल्याचा आणि त्यामुळे शालेय विद्यार्थी, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचाही आरोप अर्जात करण्यात आला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून रस्ता पूर्ववत खुला ठेवावा, तोडलेली पाणीपुरवठा पाइपलाइन तातडीने दुरुस्त करावी आणि संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी अर्जदारांनी केली आहे.

error: Content is protected !!