
इगतपुरीनामा न्यूज -शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी विद्यार्थ्यांना किती संघर्ष करावा लागतो, याचे दाहक उदाहरण इगतपुरी तालुक्यातील भावलवाडी येथे समोर आले आहे. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत पडल्यामुळे पहिली ते चौथीच्या निष्पाप विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज जीव धोक्यात घालून पाण्याचा ओहळ पार करावा लागत आहे. विशेष म्हणजे लवकरच यावर कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्यास पालकांसह एल्गार कष्टकरी संघटनेने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
इगतपुरी तालुक्यातील भावलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत पडल्याने येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. शिक्षणात खंड पडू नये म्हणून या विद्यार्थ्यांना आता जीव मुठीत धरून एका वाडीतून दुसऱ्या वाडीतील शाळेत शिक्षणासाठी जावे लागत आहे. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांसमोर दुसरा कोणताही सोयीस्कर मार्ग उपलब्ध नाही. परिणामी वाडीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना दररोज प्रवासात पाण्याचा तीव्र ओहळ पार करावा लागतो. पाण्याच्या प्रवाहात वाढ झाल्यास या लहानग्यांचा जीव अधिकच धोक्यात येतो. या बिकट परिस्थितीमुळे पालकांच्या पोटात नेहमीच भीतीचा गोळा असतो. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या गंभीर प्रकाराबाबत स्थानिक नागरिकांमध्ये आणि पालकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. प्रशासनाच्या या अनास्थेविरुद्ध एल्गार कष्टकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. “लवकरात लवकर भावलवाडीतील विद्यार्थ्यांच्या सुरळीत शिक्षणासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अन्यथा मुलांना घेऊन थेट जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडण्यात येईल,” असा आक्रमक इशारा एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे. आता या बिकट समस्येची दखल घेत शासन व प्रशासन या चिमुकल्यांच्या सुरक्षेसाठी आणि शिक्षणासाठी नेमकी काय पावले उचलते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.