महावितरणच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू : ग्रामस्थांचा संताप, भरपाई आणि कारवाई होईपर्यंत मृतदेह स्वीकारण्यास नकार

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील घोटीवाडी येथे विज प्रवाह उतरलेल्या खांबाला धक्का लागून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजेंद्र उर्फ पिंटू अशोक भगत, वय ३५, रा. घोटीवाडी, ता. इगतपुरी, जि. नाशिक असे दुर्दैवी युवकाचे नाव आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच हा जीव गेल्याचा आरोप केला आहे. जोपर्यंत संबंधित कुटुंबाला भरीव नुकसान भरपाई दोषींवर कारवाई होत नाही आणि वीज वाहिनी भूमिगत (अंडरग्राऊंड) केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह न उचलण्याचा निर्धार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घोटीवाडी परिसरातून गेलेल्या विद्युत वाहिनीच्या खांबात वीज प्रवाह उतरलेला होता. त्याचा धक्का लागल्याने राजेंद्र उर्फ पिंटू अशोक भगत ह्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, या धोकादायक वीज वाहिनीबाबत त्यांनी दोन दिवसांपूर्वीच महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. ही लाईन तातडीने भूमिगत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. जर वेळीच दखल घेतली असती, तर आज या तरुणाला नाहक जीव गमवावा लागला नसता, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. भरीव नुकसानभरपाई द्यावी यासह जोपर्यंत दोषींवर कडक कारवाई होत नाही आणि धोकादायक वीज वाहिनी भूमिगत करण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असे ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले आहे. घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केले असून, घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे महावितरणचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

error: Content is protected !!