
इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी इगतपुरी यांच्या मार्फत कुरुंगवाडी येथे खरीप हंगाम पूर्वनियोजन सभा संपन्न झाली. यामध्ये इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी अल निनोच्या संभाव्य प्रभावाबद्दल शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. याबाबत यावर्षी कमी पाऊस किंवा ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पावसाचा मोठा खंड पडण्याची व पाण्याचा पिकांवर ताण पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी कालावधीचे, पाण्याचा ताण सहन करू शकतील असे वाण निवडावे. भाताची रोपे न करता भाताची एसआरटी पद्धतीने लागवड करावी. यावेळी फळबाग लागवडीमध्ये CRA तंत्रज्ञान वापराबद्दल माहिती व प्रात्यक्षिक करून दाखविले. मंडळ कृषी अधिकारी राजेंद्र काळे यांनी भात बीजप्रक्रिया, भात बियाणे उगवण क्षमता, दशपर्णी अर्क तयार करणे याबाबत सविस्तर माहिती व प्रत्यक्ष क्षेत्रावर प्रात्यक्षिक व भात लागवडीच्या विविध लागवड पद्धती बाबत माहिती दिली. यावेळी जमलेल्या शेतकऱ्यांनी देखील भात लागवड पद्धती बाबत आपले अनुभव सांगितले. या कार्यक्रमासाठी इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके , मंडळ कृषी अधिकारी राजेंद्र काळे, सहाय्यक कृषी अधिकारी अर्चना सातपुते, माजी सरपंच शंकर सावंत, काळू निरगुडे, बाबु सावंत, एकनाथ मेंगाळ, सोमनाथ खडके, बाळू भले व दारणामाई शेतकरी गटाचे महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते.