अधिकाऱ्यांच्या तत्परतेने इगतपुरी तालुक्यात रोखला बालविवाह : ४ महिन्यांनी १८ वर्ष पूर्ण झाल्यावर होणार लग्न 

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील धारगाव येथील वडाचीवाडी येथे अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह प्रशासनाकडून रोखण्यात आला आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी पवनदत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर, गटविकास अधिकारी महेश वळवी, धारगावचे मंडळ अधिकारी हेमंतकुमार पोटिंदे यांनी ही कार्यवाही यशस्वी केली. धारगावला बालविवाह होत असल्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांना समजले होते. त्यांनी याबाबत तातडीने कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या. स्थानिक प्रशासन, पोलीस अनो ग्रामस्थांच्या सहकार्याने ही कारवाई यशस्वी झाली. अधिकाऱ्यांनी संबंधित कुटुंबीयांशी दुष्परिणामांविषयी माहिती दिली. यावेळी मुलगा व मुलीचे समुपदेशन करण्यात आले. बालविवाहामुळे मुलींच्या आरोग्यावर, मानसिक व बौद्धिक विकासावर,  शारीरिक वाढीवर गंभीर परिणाम होऊ शकतात. याबाबत प्रशासनाकडून सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानंतर कुटुंबीयांनी प्रशासनाच्या सूचनांना सहकार्य करत हा विवाह थांबवण्यास सहमती दर्शवली. मुलीच्या वडिलांनी मुलीचे वय ४ महिन्यांनी १८ वर्षे पूर्ण झाल्यावर हा विवाह करण्याबाबत लेखी सहमती दिली. प्रशासनाच्या जागरुकतेने बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.

error: Content is protected !!