महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकराजा पालखी सोहळा उत्साहात
भाविकांच्या अनुपस्थितीत महाशिवरात्र संपन्न
गावकऱ्यांचे लांबुनच दर्शन : काही लोकांकडून नियमांना कोलदांडा

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ (  ज्ञानेश्वर महाले, त्र्यंबकेश्वर यांच्याकडून )
महाशिवरात्री निमित्ताने आद्य ज्योतिर्लिंग असलेले क्षेत्र त्र्यंबकेश्वर मध्ये महामृत्युंजय भगवान त्र्यंबकराजा पालखी सोहळा आज पार पडला. आधीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविक भक्तांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने  महाशिवरात्रीचा उत्सव बंद केला आहे. महाशिवरात्रीनिमित्त होणारा पालखी सोहळा शासनाच्या निर्देशानुसार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी प्रभू त्र्यंबकराजाचा मोठा जंगी पालखी सोहळा होत असतो,
परंतु कोविडच्या निर्बंधामुळे  या वर्षी परंपरेनुसार पालखी सोहळा काढण्यात आला. परंतु पालखी कुठेही न थांबता पाचाळी मार्गे तीर्थराज कुशावर्त येथे जाऊन श्रींचे शाही स्नान पार पडले.
भाविकांच्या अनुपस्थितीत आज इतिहासात प्रथमच महाशिवरात्र संपन्न झाली. कोविड पार्श्वभूमीवर मंदिर बंद होते. कलियुगात महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर मंदिर प्रथमच बंद राहिले. मंदिरांच्या अंतर्गत मंदिरातील त्रिकाल पूजा संपन्न झाल्या. आज रात्री बारा वाजता महापूजा होईल. दुपारी तीन ते पाच या वेळेत त्र्यंबकेश्वराची पालखी पाच आळी मार्गे मिरवण्यात आली. पालखीत त्र्यंबकेश्वराची सोन्याची मूर्ती होती. देवाला कुशावर्तात स्नान घालण्यात आले. पूर्वीचे संस्थानिक जोगळेकर वाड्यावरून पालखी नेण्याचा प्रघात आहे.
नागरिकांनी ठिकठिकाणी रांगोळी काढून व पुष्पवृष्टी करून पालखीचे स्वागत केले. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. देवस्थानचे अध्यक्ष न्या. एम. एस. बोधनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळा झाला. विश्वस्त प्रशांत गायधनी, संतोष कदम, तृप्ती धारणे, पंकज भुतडा, दिलीप तुंगार, भूषण अडसरे, सत्यप्रिय शुक्ल, कार्यकारी अधिकारी समीर वैद्य यांसह पालखी संबंधित मंडळी उपस्थित होती त्र्यंबकेश्वर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. त्यानंतर जुने महादेव मंदिरात भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी भाविकांनी शिवउपासना केली. कुशावर्त तीर्थावर दर्शनास बंदी होती. काहींनी मंदिराच्या बंद दरवाजावर डोके टेकवत दर्शन घेतले. कोविडचे संपूर्ण नियम पळून त्र्यंबक वासीयांनी पालखीचे लांबुनच, गच्ची वरून, घरातून दर्शन घेणे पसंत केले. परंतु परगावाहून आलेल्या काही भाविकांकडून नियमाला कोलदांडा घालण्यात आला. प्रमाणापेक्षा जास्त संख्येने भाविक पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. यावर प्रशासनाने वेळीच आवर घातल्याने मोठी गर्दी टळली.

त्र्यंबकेश्वर येथील त्र्यंबकराजांचा पालखी सोहळा
त्र्यंबकेश्वर येथील त्र्यंबकराजांचा पालखी सोहळा

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!