
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील तळेगाव बुद्रुक येथील गट क्रमांक २१४ मधील वडिलोपार्जित आदिवासी जमीन बोगस वारस नोंद करून परस्पर विकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी प्रशासनाकडून योग्य न्याय न मिळाल्यास आगामी २ ऑक्टोबर २०२६ रोजी तहसील कार्यालयासमोर कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा पीडित आदिवासी शेतकरी वसंत नाना भगत यांनी दिला आहे. तक्रारदार वसंत नाना भगत यांच्या म्हणण्यानुसार, सदर जमीन दोन हेक्टर ५६ आर असून ती अमृता रामा लोभी, काशीबाई अमृता लोभी व अहिल्याबाई अमृता लोभी यांच्या वारसांच्या (गंगुबाई नाना भगत) नावावर होती. या जमिनीची वारस नोंद क्र. २७९३ आधीच मंजूर असतानाही संबंधित तलाठी यांनी नियम डावलून बोगस वारस नोंद क्र. २८७७ दाखल केल्याचा आरोप आहे. पांडुरंग गोविंद वारे यांनी आपण सख्ख्या बहिणीचा मुलगा असल्याचे भासवून ही नोंद करून घेतल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, मंडळ अधिकाऱ्यांनी ही नोंद ९ फेब्रुवारी २०१० रोजीच रद्द केली होती; मात्र त्यानंतरही ७/१२ उताऱ्यावर पांडुरंग वारे यांचे नाव बेकायदेशीरपणे कायम राहिल्याचा दावा तक्रारीत केला आहे. ७/१२ उताऱ्यावर नाव कायम असल्याचा गैरफायदा घेऊन पांडुरंग वारे यांनी सदर जमीन संजय नारायण साबळे यांना परस्पर विकल्याचा आरोप आहे.
आदिवासी जमिनीच्या हस्तांतरणासंदर्भातील कायदेशीर तरतुदींचे व नियमांचे या व्यवहारात उघडपणे उल्लंघन झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून झालेली विक्रीची परवानगी रद्द करावी आणि जमीन तातडीने मूळ मालकांच्या नावावर दाखल करावी, अशी मागणी पीडित शेतकऱ्याने केली आहे. शेतकरी संघटनेचे राज्य संपर्कप्रमुख बाळासाहेब धुमाळ व आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष भागवत भगत यांनीही तहसीलदारांकडे निवेदने देऊन या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. या संदर्भात विभागीय आयुक्तांकडे २७ जुलै २०२६ रोजी, तर अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे २४ जुलै २०२६ रोजी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप न्याय मिळाला नसल्याने हताश झालेल्या वसंत नाना भगत यांनी येत्या २ ऑक्टोबर २०२६ रोजी कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.