इगतपुरीत ६० हजार रोपांची लागवड ; अटल वनविभागाची अटल आनंदवन घनवन योजना : नटलेल्या हिरवाईने होणार पर्यटनाचा विकास 

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी नगरपरिषद हद्दीतील गोल टेकडी परिसरात, रेल्वे तलावासमोर अटल आनंदवन घनवन योजनेअंतर्गत २ हेक्टर क्षेत्रावर तब्बल ६० हजार विविध प्रजातींच्या रोपांची व झाडांची लागवड करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे शहरातील हिरवाईत मोठी भर पडणार असून भविष्यात हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीनेही आकर्षणाचे केंद्र ठरण्याची शक्यता आहे. उपक्रमाच्या समारोपावेळी इगतपुरीचे नगरसेवक भूषण जाधव, रोहिदास डावखर, नगरसेविका आशा भडांगे, राज जावरे, वनपरिक्षेत्र अधिकारी कांचन भुसाळ, वनपरिमंडळ अधिकारी योगेश गावित, वनरक्षक सविता ठाकूर, अश्विनी पाटील, कैलास पोटींदे, मुज्जू शेख आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. दोन हेक्टर क्षेत्रावर ६० हजार रोपांची लागवड हा उपक्रम शहराच्या पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

गोल टेकडी परिसर हा इगतपुरी शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, रेल्वे तलावाच्या समोरील या भागात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड झाल्याने आगामी काळात परिसराचे नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलून दिसणार आहे. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर या प्रकारच्या हरित प्रकल्पामुळे पर्यावरण संवर्धनाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. हा प्रकल्प केवळ वृक्षलागवडीपुरता मर्यादित नसून पर्यटनाच्या दृष्टीनेही परिसर विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पर्यटकांना या हिरव्यागार परिसरात फिरता यावे यासाठी आवश्यक रस्ते व सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे भविष्यात गोल टेकडी परिसर नागरिकांसह पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण होईल. इगतपुरीला लाभलेले निसर्गसौंदर्य, डोंगररांगा, तलाव आणि हिरवाई यामध्ये या प्रकल्पामुळे आणखी एका सुंदर हरित क्षेत्राची भर पडणार आहे.

error: Content is protected !!