नदीतून वाट काढत चिमुकले विद्यार्थी गाठतात शाळा ; पुरावेळी आठ आठ दिवस शाळेला दांडी : दहावीनंतर मुलींचे शिक्षण होतेय बंद ; अंगणवाडीचाही लाभ नसल्याने वाढले कुपोषण

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील भांगरेवाडी ( खडकेद ) ह्या रस्ता नसलेल्या आदिवासी वाडीची व्यथा इथल्या आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य बिघडवणारी ठरत आहे. खडकेद जिल्हा परिषद शाळेमध्ये १ ली ते ८ वी इयत्तेत शिकणाऱ्या ह्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनाही शाळा गाठण्यासाठी वाहणारी नदी ओलांडून जावे लागते आहे. नदीला पाणी कमी असले तरच शाळेत जाण्यासाठी संधी मिळते, अन्यथा ह्या विद्यार्थ्यांना आठ दहा दिवसांची अघोषित सुट्टी मिळते. यामुळे ह्या आदिवासी वाडीमध्ये शिक्षणाचा बट्याबोळ झाल्याचे चित्र आहे. ह्या वाडीला रस्ता नसल्यामुळे जेमतेम शिक्षण झाल्यावर अर्धवट शिक्षण सोडावे लागते. उच्च शिक्षण करणारे सध्यातरी येथे कुणीही नाही. धक्कादायक म्हणजे इथल्या मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्णपणे थांबलेले आहे. पहाटे ५ वाजता उठून नदी ओलांडून कॉलेज गाठणे कठीण असल्याने मुलींनी शिक्षणाचा नाद सोडला आहे. याहीपेक्षा विशेष बाब म्हणजे ह्या आदिवासी वाडीत बालकांची संख्या मोठी असूनही अंगणवाडी नाही. परिणामी नदी ओलांडून गावातल्या अंगणवाडीत कोणीही बालक पाठवले जात नाही. यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर कुपोषण असण्याची शक्यता आहे. आदिवासी ग्रामस्थांना पावसाळ्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. जोरात वाहणारी नदी, रस्त्यावर वाहणारे पाणी, चिखलातून वाट काढणाऱ्या ग्रामस्थांचा केविलवाणा संघर्ष कधी संपेल याची प्रतीक्षा आहे. राज्याचे शिक्षणमंत्री ना. दादासाहेब भुसे नाशिक जिल्ह्यातील असून क्रीडा मंत्री ना. माणिकराव कोकाटे या भागाचे प्रतिनिधित्व करतात. यांच्यासह प्रशासनाने भांगरेवाडी वरील अन्याय दूर करण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी गुणाजी खतेले यांनी केली आहे.

error: Content is protected !!