काँग्रेस नेते राहुल गांधींकडे इगतपुरी तालुका काँग्रेसकडून पोहोचला जनतेचा आवाज : तालुकाध्यक्ष रामदास धांडे यांनी मांडले जनतेचे विविध प्रश्न

इगतपुरीनामा न्यूज : नाशिकच्या भूमीत लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी इगतपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामदास पाटील धांडे यांनी राहुल गांधी यांचे मनःपूर्वक स्वागत करत इगतपुरी तालुक्यातील जनतेच्या विविध प्रश्नांचा आणि अपेक्षांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवला. प्रकल्पग्रस्त, आदिवासी, कामगार, शेतकरी, व्यापारीवर्गाचे महत्वपूर्ण प्रश्न राहुल गांधी यांच्याकडे मांडण्यात आले. आगामी काळात या विषयावर सकारात्मक लक्ष घालून ते सोडवण्यासाठी कृतिशील राहू असा शब्द राहुल गांधी यांनी यावेळी दिला. राहुल गांधी यांचा संघर्ष, निर्भीड विचारसरणी आणि सर्वसामान्य जनतेप्रती असलेली बांधिलकी ही देशातील परिवर्तनाची ताकद असल्याचे यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत इगतपुरी तालुका काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिवर्तनाच्या नव्या पर्वासाठी सज्ज असल्याचा निर्धार व्यक्त केला. “इगतपुरीची माती, काँग्रेसचा विचार आणि राहुलजींचे नेतृत्व” या भावनेतून तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. आगामी काळात सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी अधिक जोमाने संघर्ष करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

error: Content is protected !!