एल निनो प्रभावामुळे कमी व अनियमित पावसाची शक्यता : शेतकर्‍यांसाठी इगतपुरी कृषी विभागाचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज – हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी ‘एल निनो’ स्थिती सक्रिय असण्याची शक्यता असल्याने पावसाचे प्रमाण कमी किंवा खंडित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकर्‍यांनी या परिस्थितीमध्ये आपल्या शेतीचे योग्य नियोजन करावे असे आवाहन इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी केले आहे. तालुक्यात खरीपाचे एकूण सरासरी क्षेत्र 30947.24 हे. असून यामध्ये मुख्यत्वे भात 26210.85 हे., वरई  1016.90 हे., नाचणी/ नागली  1514.80 हे., सोयाबीन 502.90 हे. या पिकांचा समावेश होतो. या हंमागामध्ये या पिकांची एल निनो पार्श्वभूमीवर काळजी घेणे आवश्यक आहे.

मागील वर्षी 21 जून 2025 अखेर 298.90 मि.मि. पाऊस झाला होता. एल निनो च्या पार्श्वभुमीवर यावर्षी आजपर्यंत फक्त 8.90 मि.मि. पाऊस झालेला आहे. यावर्षी भारतीय हवामान विभागानेही सरासरीच्या 90% +_5% इतक्या पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येत असून, शेतकर्‍यांनी खालील मुद्द्यांचा काटेकोर अवलंब करावा :

 घाईघाईने पेरणी टाळा(पावसाची खात्री करा )– अपुर्‍या पावसावर किंवा पहिल्याच मोठ्या पावसावर घाईघाईने पेरणी करू नका. जोपर्यंत 75 ते 100 मिमी पाऊस पडत नाही व जमिनीमध्ये पेरणीयोग्य पुरेशी ओल निर्माण होत नाही आणि पावसाची खात्री पटत नाही, तोपर्यंत पेरणी करणे टाळावे.

संपूर्ण क्षेत्राची एकाच दिवशी पेरणी टाळा – जोखीम कमी करण्यासाठी आपल्या संपूर्ण शेती क्षेत्रावर एकाच दिवशी पेरणी न करता टप्प्याटप्प्याने पेरणीचे नियोजन करावे,  जेणेकरून पावसाचा खंड पडल्यास संपूर्ण पीकाचे  एकाच वेळी होणारे नुकसान टाळता येईल.

राखीव बियाण्याचा साठा ठेवा – पावसाच्या लहरीपणामुळे जर पहिली पेरणी उलटली (दुबार पेरणीची वेळ आली), तर ऐनवेळी धावपळ होऊ नये म्हणून शेतकर्‍यांनी आपल्याकडे राखीव बियाण्याचा साठा करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तालुक्यात भाताचे 26210 हे व सोयाबीनचे क्षेत्र 253 हेक्टर आहे, यासाठी मागील 3 वर्षात बाजारातून बियाणे घेतले असेल तर घरचेच बियाणे, बियाणे उगवण क्षमता तपासून राखीव ठेवणे व पेरणे योग्य राहील.

कमी कालावधीच्या आणि दुष्काळसहिष्णू वाणांना प्राधान्य – दीर्घ मुदतीच्या पिकांऐवजी कमी कालावधीत तयार होणार्‍या आणि पाण्याचा ताण सहन करू शकणार्‍या (दुष्काळसहिष्णू) पिकांची व वाणांची निवड करावी. यामुळे कमी पावसातही हातात उत्पादन येण्याची शक्यता वाढते 

धान्य व कडधान्य पिकांची निवड – तालुक्यात  भाताच्या बांधावर तूर,मूग, उडीद यांसारख्या कमी पाण्यात येणार्‍या पारंपरिक  पिकांना प्राधान्य द्यावे. डोंगराळ भागासाठी नाचणी, वरई यासारख्या पिकांची लागवड उताराला आडवी करावी.

मशागत आणि पाणी अडवण्याच्या आधुनिक पद्धती (BBF तंत्रज्ञान) – गादीवाफा (BBF – Broad Bed Furrow) पद्धती : सोयाबीन पेरणीसाठी गादीवाफा पद्धतीचा अवलंब करा. या पद्धतीमुळे कमी पाऊस झाल्यास पिकाच्या मुळांशी पाणी साठून राहते आणि जास्त पाऊस झाल्यास पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो. जरी bbf मशीन उपलब्ध झाले नाही तरी पेरणी यंत्राने पेरणी करताना एका ओळींचा नळा बंद करावा व  उगवणींनंतर 15 दिवसांनी मृत सरी काढावी.तसेच भात पिकाची DSR /SRT पद्धतीने गादी वाफ्यावर पेरणी करावी.

संरक्षित सिंचन आणि शेततळे निर्मिती – पावसाचे पाणी साठवण्यासाठी शेतामध्ये शेततळे किंवा जलसाठे निर्माण करण्यावर भर द्यावा. यासाठी शेततळ्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे उपलब्ध असलेल्या  शेततळ्यामध्ये साठवलेले हे पाणी केवळ पिकाला पाण्याचा ताण पडेल अशा संवेदनशील अवस्थेत ‘संरक्षित सिंचन’ म्हणून वापरण्यासाठी राखून ठेवावे. 

सुक्ष्म सिंचनाचा (ठिबक व तुषार) काटेकोर वापर – उपलब्ध पाण्याचा थेंब अन् थेंब वाचवण्यासाठी मोकाट पद्धतीने पाणी न देता केवळ ठिबक (Drip) किंवा तुषार (Sprinkler)  सिंचन पद्धतीचाच वापर करावा. यासाठी mahadbt वर अर्ज प्रकिया सुरू आहे.

शेती व्यवस्थापन आणि हवामान अंदाज – शेतातील तण ओलावा शोषून घेतात, म्हणून खुरपणी व कोळपणी वेळेवर करून शेत तणमुक्त ठेवावे, जेणेकरून जमिनीतील ओलावा जपला जाईल. कृषी विभागाने विकसित केलेल्या महाविस्तार Ai अँप चा वापर करून दररोजच्या हवामान अंदाजांचे माहिती घ्यावी व त्यानुसारच पिकांचे नियोजन करावे. सदरच्या अँप मधून शेतकऱ्यांनी वसुधा सुविधीचा वापर करून शंकांचे व आपल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यावी. पावसाचा दीर्घ खंड पडल्यास पर्यायी पिकांची (उदा. आकस्मिक पीक नियोजन) तयारी ठेवावी तसेच पावसाचा खंड पडल्यास रस शोषक किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे अश्या रोग व किडींचे सतत निरीक्षण करावे.

पूरक व्यवसाय व पर्यावरण संवर्धन – केवळ पिकांवर अवलंबून न राहता शेतीला पशुपालन, दुग्धव्यवसाय किंवा शेळीपालनाची जोड द्यावी, जेणेकरून उत्पन्नाचा स्रोत कायम राहील. तसेच शेताच्या बांधावर वृक्षलागवड करावी.

फलोत्पादन -फळबागांची काळजी घेतांना खालील बाबींचा विचार करावा : आंबा – झाडांची छाटणी करून झाडांचा आकार मर्यादित ठेवावा. 1% पोटॅशची फवारणी केल्यास दुष्काळी परिस्थितीत झाडे तग धरू शकतात. प्रकाश परावर्तकांचा वापर करावा. आच्छादनाचा वापर करावा. नवीन लागवडीसाठी मडका सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. “एकच पीक, एकच पेरणी आणि पावसावर पूर्ण अवलंबित्व” ही पद्धत यंदा पूर्णपणे टाळायची आहे. यशाचे सूत्र : मिश्र पीक पद्धती + कमी कालावधीचे वाण + पाणी साठवण + हवामानानुसार निर्णय = आजचे नियोजन, उद्याचे सुरक्षित उत्पादन आणि उत्पन्न. शेतकरी बांधवांनी – पाणी अडवा, पाणी जिरवा, मिश्र पीक घ्या, जोखीम कमी करा आणि हवामानाशी जुळवून घ्या, या सूत्रांचा अंगीकार करावा, असे आवाहन  कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

error: Content is protected !!