धामणगाव – १ कोटी ६९ लाख रुपयांच्या जल जीवन मिशनच्या निकृष्ट कामाबाबत आमरण उपोषण : प्रशासनाकडून भ्रष्टाचाराला पाठबळ व दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत १ कोटी ६९ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी होऊन संबंधितांवर कारवायू व्हावी यासाठी धामणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश गाढवे यांच्या नेतृवाखाली कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसले आहेत. धामणगावात १ कोटी ६९ लाख रुपयांच्या जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेमध्ये झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत आणि भ्रष्टाचाराबाबत काही दिवसांपूर्वी तक्रार केली होती. त्यावर प्रशासनाने १५ दिवसांत विशेष पथकामार्फत चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र अद्याप चौकशी झाली नाही. न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण सुरूच राहील असे उपोषणकर्त्यांनी सांगितले. आश्वासनानुसार काही दिवसांपूर्वी संबंधित खात्याचे अधिकारी गावात पाहणीसाठी आले होते. मात्र अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे एवढ्या मोठ्या १ कोटी ६९ लाख रुपयाच्या योजनेची चौकशी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडे कामाचे कुठलेही अधिकृत कागदपत्रे ब्लू-प्रिंट किंवा अंदाजपत्रक उपलब्ध नव्हते. आम्ही याविषयी जाब विचारला असता, संबंधित अधिकाऱ्यांनी अत्यंत बेजबाबदारपणे सांगितले की, “आम्ही संबंधित खात्याला डॉक्युमेंट्स मागितले आहेत, पण ते अजून आलेले नाहीत. त्यामुळे कागदपत्रे नसल्यामुळे आम्ही हे काम आणि ऑडिट पूर्ण करू शकत नाही. ज्या दिवशी आमच्याकडे डॉक्युमेंट्स येतील, त्याच दिवशी आम्ही चौकशी करू असे सांगितले. उपोषणात सागर गाढवे, विजय गाढवे, महेश गाढवे, विलास वाकचौरे, कमलेश गाढवे, समाधान लगड, हर्षद गाढवे, राजू रंगनाथ गाढवे, संपत वाकचौरे, योगेश देशमुख, विक्रम घुमरे, जनार्दन गाढवे, अशोक गाढवे, पुंजाराम गाढवे, माजी सरपंच निवृत्ती जाधव यांनी उपोषणकर्त्यांना जाहीर पाठिंबा दिला.

आधी चौकशीचे आश्वासन देऊन आंदोलन स्थगित करायला लावणे आणि महिनाभरानंतर जेव्हा अधिकारी येतात, तेव्हा कोणतीही कागदपत्रे न आणता ‘कागदपत्रे आल्यावर चौकशी करू’ अशी उडवाउडवीची उत्तरे देणे, यावरून हे स्पष्ट होते की प्रशासन आणि संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक या योजनेतील भ्रष्टाचाराला पाठबळ देण्याचा व दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. जोपर्यंत या १ कोटी ६९ लाख रुपयांच्या कामाची सर्व अधिकृत कागदपत्रे समोर ठेवून वरिष्ठ पातळीवरून तांत्रिक पाहणी केली जात नाही आणि सविस्तर अहवाल Quality कंट्रोल Repot ग्रामस्थांसमोर जाहीर केला जात नाही, तोपर्यंत आमचा हा लढा थांबणार नाही.

 –  मंगेश गाढवे, सामाजिक कार्यकर्ते

error: Content is protected !!