समृद्धी टोलनाक्यावर पाणी विक्रीच्या वादातून ५ जणांकडून एकाला मारहाण ; जिवे मारण्याची धमकी

इगतपुरीनामा न्यूज – समृद्धी टोलनाका नांदगाव सदो येथे चहा व पाणी बाटल्यांची विक्री करण्यावरून झालेल्या वादातून पाच जणांच्या टोळक्याने एका जणाला काचेच्या बाटलीने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष शंकर म्हसणे (वय ३२, रा. फांगुळगव्हाण) हे पाणी बॉटल विक्रीचा व्यवसाय करतात. दि. १२ जुलै रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास समृद्धी टोलनाका, नांदगाव सदो शिवारातआरोपी दत्तू तुकाराम आतकरी याने फिर्यादींकडे कुरापत काढली. “येथे चहा व पाणी बॉटलची विक्री करायची नाही,” असे म्हणत आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात काचेची बाटली मारली. यावेळी आरोपी दत्तू आतकरी याच्यासोबत असलेल्या बाळू तुकाराम आतकरी, भागीरथ तुकाराम आतकरी, नामदेव तुकाराम आतकरी आणि हरिश्चंद्र तुकाराम आतकरी (सर्व रा. नांदगाव सदो) यांनी मिळून फिर्यादी व साक्षीदारांना हाताने मारहाण केली. त्यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेबाबत संतोष म्हसणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून इगतपुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षेची तरतूद असलेला हा गुन्हा असल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक घनश्याम बळाफ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आला आहे.

error: Content is protected !!