
इगतपुरीनामा न्यूज – राज्याचे कृषी सचिव परिमल सिंह यांनी इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो येथे भेट देऊन महिला शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी महिला शेतकऱ्यांनी भात पिकामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध आधुनिक व शाश्वत कृषी तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती कृषी सचिवांना दिली. महिला शेतकऱ्यांनी भात बियाण्याची बीजप्रक्रिया, उगवण क्षमता तपासणी, हिरवळीच्या खताचा वापर, नियंत्रित लागवड, चिकट सापळ्यांचा वापर याबाबत प्रत्यक्ष शेतातील अनुभव सचिवांसमोर मांडले. भात पिकातील कीड व्यवस्थापन, उत्पादन वाढीसाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर आणि पर्यावरणपूरक शेती पद्धती याबाबतही महिलांनी माहिती दिली. महिला शेतकऱ्यांनी आत्मविश्वासाने कृषी तंत्रज्ञानाची माहिती मांडल्याबद्दल कृषी सचिव परिमल सिंह यांनी समाधान व्यक्त केले. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण करणाऱ्या महिला शेतकऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी परिमल सिंह यांनी प्रक्षेत्रावरील श्री पद्धतीच्या भात लागवड प्रात्यक्षिकाची पाहणी केली. शेतकऱ्यांशी एल निनो बाबत चर्चा केली. इगतपुरी तालुक्यात याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे महिलांनी सांगितले. विभागीय कृषी सह संचालक सुभाष काटकर यांनी सचिव यांना इगतपुरी तालुक्यासह जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिक आणि प्रकल्पा विषयी माहिती दिली. इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी प्रात्यक्षिक राबवितांना ठेवलेल्या नोंदी, फोटो, वर्तमान पत्रातील बातम्या यांचा अल्बम या विषयी सचिव परिमल सिंह यांनी कौतुक केले.
या दौऱ्यात कृषी सचिव परिमल सिंह यांनी घोटी येथील वूमेन्स पॉवर फार्मर प्रोडूसर कंपनी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी लाकडी घाण्याद्वारे खाद्यतेल निर्मिती युनिटची पाहणी करून कंपनीच्या सदस्यांशी संवाद साधून तेल निर्मिती व पूर्ण उद्योगाची सविस्तर माहिती जाणून घेत त्यांना येणाऱ्या अडचणी बाबत चर्चा केली. या प्रसंगी नाशिक विभागाचे कृषी सह संचालक सुभाष काटकर, नाशिक जिल्ह्याचे अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने, आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, उपविभागीय कृषी अधिकारी रविंद्र वाघ, तालुका कृषी अधिकारी रामदास मडके आदी अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळ कृषी अधिकारी संजय पाटील, अजय खैरनार, राजेंद्र काळे, सहाय्यक कृषी अधिकारी मोहन तागड, हेमराज देशमुख, स्वप्ना राठोड, समाधान भोये, मनोहर टोपले, हितेंद्र मोरे यांनी प्रयत्न केले. महिला शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब आणि सचिवांसमोर त्यांनी आत्मविश्वासाने मांडलेली माहिती यामुळे नांदगाव सदो येथील हा संवाद विशेष ठरला. नांदगाव सदो येथील महिला शेतकरी ज्योती भागडे, सुजाता भागडे, आशा भागडे, लक्ष्मी भागडे, सविता भागडे, शोभा भागडे, सुनीता भागडे, रूपाली भागडे, लक्ष्मी कडू,शारदा जगताप, दिपाली तांदळे, जयाबाई तांदळे, लक्ष्मी भागडे, लिलाबाई भागडे आदी उपस्थित होते.
