
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – “शेतात राबणारा शेतकरी हाच खऱ्या अर्थाने देशाचा कणा आहे. पण त्याचे कष्ट नेमके किती अथांग असतात, याची प्रचीती तेव्हाच येते जेव्हा स्वतः मातीत पाऊल ठेवले जाते.” हाच प्रत्यय इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथे आला. नाशिकचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, ‘आत्मा’ प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके या अधिकाऱ्यांनी अति पाऊस सुरु असतांना थेट बांधावर आणि चिखलात उतरून बळीराजाच्या कष्टांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करत शेतकरी वर्षभर कशी मेहनत करतो हे कागदोपत्री समजण्यापेक्षा ते अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष अनुभवले. मुसळधार पाऊस आणि गुडघ्यापर्यंत साचलेला चिखल या प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता हे अधिकारी थेट शेतात उतरले. चिखलात पावले रोवत त्यांनी भात लावणी कशी केली जाते, अति पावसातही घाम गाळत शेतकरी कसा जगतो याची अनुभूती घेतली. “शेतकऱ्यांच्या घामाचा प्रत्येक थेंब किती मोलाचा असतो हे आज चिखलात उतरल्यावर समजले. हा केवळ एक अनुभव नसून, आमच्यातील संवेदनशीलता अधिक तीव्र करणारा क्षण आहे,” अशी भावना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, आत्मा प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद यांनी व्यक्त केली.
यावेळी पानी फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेअंतर्गत श्री स्वामी समर्थ महिला शेतकरी गटाच्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधला. गटाच्या निमंत्रक सुमन भाऊसाहेब धांडे, सदस्य सपना सुरज धांडे यांनी गटशेतीद्वारे केलेली एकत्रित निविष्ठा खरेदी, त्यातून झालेली खर्चात बचत, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, सामूहिक श्रमातून मजुर टंचाईवर मिळवलेले यश याविषयी माहिती दिली. पुष्पांजली प्रल्हाद धांडे यांच्या शेतावर चारसूत्री भात लागवड पद्धतीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यामध्ये चिखलणीपूर्वी गिरीपुष्पाच्या पाल्याचा वापर, २५ × २५ सेंमी अंतरावर नियंत्रित भात लागवड आणि लागवडीपूर्वी रोपांची महाजैविक प्रक्रिया यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. आत्मा प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद यांनी जीवामृत निर्मितीच्या प्रात्यक्षिकाने नैसर्गिक शेतीचे महत्त्व स्पष्ट केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी गटाच्या एकजुटीचे, नियोजनाचे व नाविन्यपूर्ण शेती पद्धतींचे विशेष कौतुक करत उत्पादनवाढीसाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन केले. त्यांनी फार्मर कप स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या तंत्रज्ञानामुळे उत्पादनवाढीसोबतच उत्पादन खर्चात बचत होत असल्याची माहिती देण्यात आली. महिला शेतकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांना, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाला आणि शाश्वत शेतीच्या दिशेने होत असलेल्या वाटचालीला या भेटीमुळे मोठे प्रोत्साहन मिळाल्याचे पानी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक विक्रम फाटक म्हणाले. यावेळी पानी फाउंडेशनचे उपविभागीय समन्वयक अजिंक्य गुरव, कल्याणी माळी, मंडळ कृषी अधिकारी अजय खैरनार, संजय पाटील, उप कृषी अधिकारी आबासाहेब आटोळे, सहायक कृषी अधिकारी हरीष चव्हाण, शिवचरण कोकाटे, विद्या फुसे, हेमराज देशमुख, हितेंद्र मोरे, शेतकरी पांडुरंग धांडे, दत्तू गायकर आदी हजर होते.
