
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – २०१९ ला दोन टर्म काँग्रेसच्या तिकीटावर आमदारकी भूषवणाऱ्या निर्मला गावित यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकसंघ शिवसेनेत प्रवेश केला. आकस्मिकरित्या इगतपुरी तालुका काँग्रेस थोडीशी विचलित झाली. पण तत्कालीन काँग्रेस तालुकाध्यक्ष रामदास पाटील धांडे यांनी मुळच्या राष्ट्रवादीच्या हिरामण खोसकरांना पक्षात घेऊन त्यांच्या विजयासाठी जीवाचे रान केले. त्यांच्या तालुकाध्यक्षपदाची खरी परीक्षा त्याच वेळेस होऊन हिरामण खोसकर आमदार झाले. २०२४ च्या निवडणुकीसाठी विद्यमान आमदार हिरामण खोसकर आणि अन्य १९ जण काँग्रेसची उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुक होते. यातील अनेकांनी रामदास धांडे यांना शिफारस करण्यासाठी मोठी अर्थपूर्ण ऑफर सुद्धा दिली. हिरामण खोसकर हे महायुतीमध्ये अनेक काँग्रेस जणांना घेऊन गेले. त्यामुळे रामदास धांडे हे मोठ्या धर्मसंकटात सापडले. अखेर पक्षश्रेष्ठी घेतील त्या निर्णयानुसार त्यांनी काम करण्याचे ठरवले. एकीकडे काँग्रेसची निष्ठा अन दुसरीकडे मलईदार ऑफर रामदास धांडे यांना मिळत होत्या. मात्र त्यांनी मलईदार ऑफर सपशेल धुडकावत पक्षासोबत एकनिष्ठ राहण्याचा आपला निर्धार कायम ठेवला. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार प्रदेश काँग्रेसने आदिवासी विकास परिषद आणि काँग्रेसच्या माध्यमातून राज्यभर असणारा आक्रमक युवा चेहरा लकीभाऊ जाधव यांना पक्षाची उमेदवारी घोषित केली. अपेक्षेनुसार खुद्ध तालुका काँग्रेसमधून ह्या नावाला कमालीचा विरोध झाला. उबाठा शिवसेनेत असूनही काँग्रेसच्या तिकिटाची अपेक्षा असणाऱ्या निर्मला गावित यांनी प्रखरपणे याला विरोध केला. त्यांनी आपल्या सोबत उरलीसूरली काँग्रेस, उबाठा शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार घेऊन बंडखोरी केली. यावेळी काँग्रेसचे उमेदवार लकीभाऊ जाधव यांच्या सोबत इंदिरा काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रामदास पाटील धांडे हे सोडून अन्य कोणीही महाविकास आघाडीचा नेता नव्हता. श्री. धांडे यांनी एकनिष्ठपणे पक्षाला यश मिळवण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आपला निश्चय ढळू दिला नाही. निवडणुकीच्या रिंगणात लकीभाऊ जाधव आणि काँग्रेस पक्ष चौथ्या क्रमांकावर दिसत असल्याने सगळे लोकं रामदास धांडे आणि काँग्रेस पक्षाला हसत होते. बुडत्या जहाजात बसणाऱ्या रामदास धांडे यांनी आपला बाणा पक्का करीत परिस्थितीशी दोन हात करण्याचा निर्धार केला.
काँग्रेस पक्षाने दिलेले उमेदवार लकीभाऊ जाधव यांना विजयापर्यंत घेऊन जाण्यासाठी काँग्रेस तालुकाध्यक्ष रामदास पाटील धांडे यांनी एकट्याने नियोजन करून ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कंबर कसली. पुण्यासारख्या ठिकाणी प्रथितयश व्यावसायिक म्हणून नामांकित असणारी त्यांची मुले हर्षद आणि गोकुळ यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत निवडणुकीच्या नियोजनात सक्रिय सहभाग घेतला. अनंत अडचणी, समस्यांचा डोंगर, लोकांमध्ये हसू, महाविकास आघाडी अपक्षाकडे गेलेली आणि फजिती पाहायला टपलेले लोकं याचा तिळमात्र विचार न करता रामदास पाटील धांडे पहाडासारखे ठासून उभे राहिले. लकीभाऊ जाधव यांची उमेदवारी घोषित झाल्यापासून ते निकालापर्यंत एक एक क्षण सूत्रबद्ध काम करण्यासाठी रामदास धांडे यांनी रात्रीचा दिवस केला. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची सभा, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या बैठका त्यांनी यशस्वी करून दाखवल्या. आराम अजिबात न करता इगतपुरी त्र्यंबकेश्वर ह्या दोन्ही तालुक्यातील प्रत्येक गाव पिंजून काढले. व्यक्तिगत संपर्काचा पुरेपूर वापर करून मीच लकीभाऊ मीच आमदार हा वेगळा विचार लोकांमध्ये भिनवला. दुसरीकडे त्यांच्या ध्येयवादी कार्यापासून त्यांना दूर करण्यासाठी अनेक विघ्नसंतोषी लोकांनी समज, गैरसमज, अफवा पसरवत अनेक गोंडस ऑफरही दिल्या. मात्र रामदास धांडे हे व्यक्तिमत्व हिमालयासारखे एकसंघ राहून किंचितही हलले नाही. लकीभाऊ जाधव यांना आमदार करायचे हे एकच ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर निश्चित झालेले होते. हळूहळू हातांच्या बोटावर मोजता येतील असे काँग्रेसी शिलेदार रामदास धांडे यांच्या सोबत काम करू लागले पण त्यातल्या अनेकांनी इथल्या बातम्या विरोधकांना देण्यासाठी त्याचा गैरवापर केला. संकटांवर संकटे उभी राहत असूनही रामदास धांडे यांनी लकीभाऊ जाधव यांची अजिबात साथ सोडली नाही. निकालाचा दिवस जवळ आला असतांना रामदास धांडे यांच्याबद्दल अनेक अफवा मुद्दामहुन पसरवल्या. वास्तविक पाहता रामदास धांडे यांचे कुटुंब उद्योगात सक्रिय असल्याने आर्थिक सुबत्ता आहे. त्यामुळे रामदास धांडे यांना पैशाने विकत घेण्याचाही प्रयत्न फसला म्हणूनच अफवा जास्त वाढवल्या गेल्या. महायुती, महाविकास आघाडी आणि अन्य पक्षांचे तालुकाध्यक्ष आणि इंदिरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामदास पाटील धांडे यांच्यात मोठा फरक आहे. परंपरागत असणारी काँग्रेस पक्षाची अभूतपूर्व निष्ठा हा मोठा फरक आहे.
रामदास धांडे यांनी त्यांच्या कौशल्यातून चौथ्या क्रमांकावर असणारा पक्षाचा उमेदवार लकीभाऊ जाधव यांना थेट विजयाच्या निर्णायक क्रमांकावर आणून ठेवले. माजी आमदार निर्मला गावित, काशिनाथ मेंगाळ यांना तीन आणि चार नंबरवर फेकण्यासाठी रामदास धांडे हेच कारणीभूत ठरले असे म्हणावेच लागेल. गावित यांच्या सोबत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि मेंगाळ यांच्या सोबत संपूर्ण मनसेचा सहारा होता. पण लकीभाऊ जाधव यांच्यासोबत फक्त एकमेव रामदास पाटील धांडे हा एकच माणूस होता. अशा अवस्थेत पक्षाला दुसऱ्या क्रमांकावर का होईना ते घेऊन गेले हे अजिबात दुर्लक्ष करण्यासारखे नाही. अभिमानाने आणि ताठ मानेने त्यांनी विजयाच्या जवळ नेवून ठेवलेले काम अतिशय प्रेरणादायी म्हणावे लागेल. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकीत रामदास पाटील धांडे आणि लकीभाऊ जाधव ही जोडगोळी अनेकांचे राजकीय आयुष्य घडवणार आहे. रामदास धांडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने उभी केलेली भक्कम निष्ठेची मराठा मते आणि लकीभाऊ जाधव यांच्यावर अपार श्रद्धा असणारी आदिवासी मते जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष, सभापती ठरवण्यासाठी अतिशय निर्णायक ठरणार आहेत. येणारा काळ आणि येणारी कोणतीही निवडणुक रामदास धांडे आणि लकीभाऊ जाधव यांना विचारात घेतल्याशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही ही काळ्या दगडावरची न पुसणारी रेषा आहे. काँग्रेस पक्ष अतिशय अडचणीत असतांना ह्या पक्षाला खरा आधार देणारे नूतन तालुकाध्यक्ष रामदास पाटील धांडे यांच्या नियुक्तीविरोधात कोल्हेकुई सुरु आहे. ही कोल्हेकुई करणारे तथाकथित निष्ठावान ऐन संकटात नेमके कुठं होते असा सवाल उपस्थित झाला आहे. प्रदेश कमिटीने ह्याचा सर्वांगीण विचार करूनच रामदास पा. धांडे यांच्यावर जबाबदारी दिली आहे. म्हणूनच निश्चितच त्यांच्याकडून ही जबाबदारी सूक्ष्मपणे पार पाडली जाईल यात कोणालाही संशय नाही.