
इगतपुरीनामा न्यूज – उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलाला लागणारे वणवे आणि त्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान रोखण्यासाठी नाशिक वनविभाग कमालीचा सतर्क झाला आहे. मौजे कोहोर हद्दीतील भयगाव येथे जंगलाला हेतूपुरस्कर आग लावून हजारो झाडे भस्मसात करणाऱ्या ४ समाजकंटक आरोपींना करंजाळी (पेठ) चे डॅशिंग वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने अटक केली आहे. जंगलात वणवा लावणाऱ्या आरोपींचा शोध लागणे अत्यंत दुर्मिळ मानले जात असताना, वनविभागाने केलेल्या या धडक कारवाईमुळे वनतस्करांचे आणि समाजकंटकांचे धाबे दणाणले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी जनार्दन वामन भोये, भास्कर पंढरीनाथ पंडागळे, कांतीलाल सुरेश गाढवे आणि वामन बाळू दळवी यांनी कोहोर परिसरातील रोपवनात काडीपेटीने हेतूपुरस्कर आग लावली. या भीषण वणव्यात परिसरातील जवळपास २५०० झाडे जळून खाक झाली. यामुळे शासनाचे अंदाजे २ लाख ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, निष्पाप पशू, पक्षी आणि नैसर्गिक वनसंपदेची अभूतपूर्व हानी झाली आहे. जंगलातील या गंभीर गुन्ह्याची दखल घेत वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार आणि त्यांच्या टीमने कसून तपास करत चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आणि त्यांना कायदेशीर धडा शिकवला.
वणवा लावणाऱ्या प्रवृत्तींना जरब बसावी यासाठी वनविभागाने तात्काळ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही केस पुढील कारवाईसाठी कोर्टात पाठवली आहे. ही यशस्वी कामगिरी पश्चिम नाशिकचे उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, सहाय्यक वनसंरक्षक निलेश कांबळे आणि पेठचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत करंजाळीचे वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार यांना वनरक्षक पुंडलिक राऊत, शंकर सहारे, मझहर शेख तसेच वनमजूर प्रवीण गाढवे, वसंत गुटे, गोरख वाघमारे आणि हेमराज कामडी यांनी मोलाचे सहाय्य केले. वनविभागाच्या या धाडसी कामगिरीबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. “जंगलाला आग लावून निसर्गाचा समतोल बिघडवणाऱ्या समाजकंटकांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही,” असा इशारा करंजाळीचे वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार यांनी दिला आहे.