कावनईचे ग्रामदैवत : कामाक्षी माता

इगतपुरी तालुक्यातील कावनई गावाला भरीव ऐतिहासिक, धार्मिक, पौराणिक वारसा लाभलेला आहे.गावची ग्रामदेवता कामाक्षीमाता मंदिरात नवरात्रोत्सवात धार्मिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. मंदिराजवळ कपिल मुनीच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी कपिलधारा तीर्थ नावाने ओळखली जाते.
ब्रिटीश काळात तालुक्याचे गाव अशी ओळख असलेल्या कावनई या गावाला धार्मिक वारसा लाभल्याचा खुणा गावातील पुरातन मंदिर, किल्ले, तीर्थे यावरून स्पष्ट होतात. गावातील कामाक्षी माता या जागृत देवस्थानात नवरात्रीमध्ये भाविकाची मोठ्या प्रमाणात मांदीयाळी असते. मातेचा भक्त दर्शन झाल्याने समाधानासह सुखाची अनुभूती घेतो. जागृत देवस्थान आणि नवसाला पावणारी भगवती अशी या देवीची ओळख आहे. या देवीचा धार्मिक लाभलेला वारसाही अलौकिक आहे.
देवी मंदिर हे पौराणिक महात्म्य लाभलेले भारतातील चार शक्तीपीठापैकी तिसऱ्या क्रमांकाचे शक्तीपीठ आहे. भारतात कांचीपुरा, गुवाहाटी, कावनई आणि करंजगाव।( शेगाव ) ही चार शक्तीपीठे आहेत. या शक्तीपिठात नवरात्रोत्सवात भाविक नवसपूर्तीसाठी या ठिकाणी येत असतात. रामायणकाळात श्रीराम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधासाठी जात असताना इगतपुरी तालुक्यातीलच सर्वतीर्थ टाकेद येथे पक्षीराज जटायू हा जखमी अवस्थेत मिळून येतो. तेव्हा या जटायूचा उद्धार करून प्रभू श्रीराम हे दंडक अरण्यात सीतेचा शोध घेत आले. त्याच वेळेस कैलास पर्वतावर शंकराचा श्रीराम हा जप सुरु असताना माता पार्वती शंकरास म्हणाली जो राम आपल्या पत्नीचा सांभाळ करू शकत नाही, त्या रामाचे ध्यान तुम्ही का करता ? यावेळी शंकराने उत्तर दिले की, जो विचार तुझा आहे तो चुकीचा आहे. तू रामाची परीक्षा घेवू शकतेस. त्या वेळेस या दंडकारण्यात माता पार्वती सीतेच्या रुपात येवून रामाला मोहित करू लागली. तेव्हा श्रीरामाने माता पार्वतीला ओळखून दंडवत घातले. तेव्हा माता पार्वती प्रसन्न होऊन कैलास पर्वतावर परतू लागली. तेव्हा माझ्यासाठी आपण इथेच रहावे असा हट्ट श्रीरामाने धरला. तेव्हा माता पार्वती या ठिकाणी कामाक्षी मातेच्या रुपाने राहिली. रामाची काम इच्छा बघण्यासाठी आलेली ही कामाक्षी माता असा वाल्मिकी रामायणात उल्लेख आढळतो. या मंदिराचा जीर्णोद्धार पेशव्यांनी इ.स..१७५० ते इ.स.१७६५ या कालखंडात केला असल्याचे आढळून येते. पेशव्यांच्या महत्वाच्या युद्धात विजयश्री खेचून आणली तेव्हा पेशव्यांनी नवसपूर्तीसाठी कामाक्षी देवीला सोने आणि चांदीचे अलंकार दिले ते या देवीच्या मूर्ती वर दर नवरात्रोत्सवात आणि चैत्र पौर्णिमेला चढवले जातात.

Leave a Reply

error: Content is protected !!