
इगतपुरीनामा न्यूज – जागतिक आदिवासी दिनाचे औचित्यावर इगतपुरी तालुक्यात कृषी विभाग, पाणी फाउंडेशन व उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ते १५ ऑगस्ट पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत एकलव्य आदिवासी शेतकरी गट, अडसरे यांनी ४०० वृक्षांची, तर जय भवानी शेतकरी गट, कुशेगाव यांनी २०० वृक्षांची लागवड करून सप्ताहाची सुरुवात केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी आद्य आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे व भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी फार्मर कपमधील सर्व शेतकरी गटांना वृक्षलागवडीचे आवाहन केले. प्रत्येक शेतकरी गटाने वृक्षारोपण करून त्याचे छायाचित्र स्मार्ट शेती ॲपवर अपलोड करावे व त्याद्वारे २ गुण मिळवावेत, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर उपस्थित मान्यवर, शेतकरी गटांचे सदस्य व ग्रामस्थांच्या सहभागातून वृक्षलागवड करण्यात आली. सत्यमेव जयते फार्मर कप २०२६ अंतर्गत इगतपुरी तालुक्यात सहभागी असलेल्या ५४ शेतकरी गटांमार्फत ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात येणार आहे.
या उपक्रमातून शेतकऱ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, जैवविविधता आणि वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यावेळी एकलव्य आदिवासी शेतकरी गटाचे सदस्य सांगदेव साबळे यांनी वन विभागामार्फत वृक्षलागवडीसाठी रोपे उपलब्ध करून दिल्याबद्दल वन विभाग व कृषी विभागाचे आभार मानले. वृक्षलागवडीच्या या उपक्रमात शेतकरी गटातील सदस्यांसह ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी संजय पाटील, उप कृषी अधिकारी नानाभाऊ पवार, पाणी फाउंडेशनचे उपविभागीय समन्वयक अजिंक्य गुरव, कल्याणी माळी, सहाय्यक कृषी अधिकारी तथा मेंटर शिवचरण कोकाटे, पुंडलिक भोई, हरीश चव्हाण यांच्यासह शेतकरी गटांचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमामुळे फार्मर कपच्या माध्यमातून शेतकरी गटांनी शेतीसोबतच पर्यावरण संवर्धनाचीही जबाबदारी स्वीकारल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळाले.