
इगतपुरीनामा न्यूज – एल निनोच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळण्यासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होऊन आपल्या पिकांचे संरक्षण करावे असे आवाहन इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी केले आहे. खरीप हंगाम २०२६ साठी प्रधानमंत्री पीकविमा योजनेची नोंदणी सुरू झाली असून इगतपुरी तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांनी ३१ जुलैपूर्वी अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले. अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, वादळ, गारपीट तसेच अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. यंदा इगतपुरी तालुक्यात भात, नाचणी, भुईमूग आणि कारळे या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना सामाईक सेवा केंद्र (सीएससी), संबंधित बँक किंवा अधिकृत ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज करता येणार आहे. शेवटच्या क्षणाची गर्दी टाळून वेळेत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभाग व इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीने केले आहे.